sports

जिल्ह्यातील 93 टक्के शाळा सुरू

उपस्थितीतही वाढ

सातारा जिल्हयातील यु-डायस प्राप्त असलेल्या 830 शाळांपैकी इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या 819 शाळा पैकी 713 शाळा सुरू झाल्या होत्या. आता वाढ होवून सध्या 759 शाळा ( 92.67 टक्के) शाळा सुरू झाल्या आहेत. 

सातारा : सातारा जिल्हयातील यु-डायस प्राप्त असलेल्या 830 शाळांपैकी इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या 819 शाळा पैकी 713 शाळा सुरू झाल्या होत्या. आता वाढ होवून सध्या 759 शाळा ( 92.67 टक्के) शाळा सुरू झाल्या आहेत. 

जिल्ह्यातील 9वी ते 12वीच्या 1,57,601 विदयार्थ्यांच्या पालकांपैकी 68907 पालकांनी संमतीपत्रे दिली आहेत. सध्या विदयार्थ्यांच्या उपस्थितीत 20 टक्के मध्ये वाढ होवून 25.56 टक्के इतके विदयार्थी उपस्थित राहत आहेत. सत्रपद्धती आणि दिवसाआड पद्धती लक्षात घेता प्रत्यक्षात 40 टक्केहून अधिक विद्यार्थी उपस्थित रहात आहेत. 

10 नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जिल्हयातील माध्यमिक व उच्च माध्यमिकचे इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग 23 नोव्हेंबर पासून सुरू झाले.राज्यात 90 टक्के पेक्षा जास्त शाळा सुरू असलेले जिल्हे मोजकेच असून त्यात सातार्‍याचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हयातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इ.9 वी ते इ.12 वी चे शिक्षक व शिक्षकेतर यांची कोवीड चाचणी करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या. सध्या जिल्हयात 70 शिक्षक व 36 शिक्षकेतर असे एकुण 106 कोरोना पॉझिटीव्ह कर्मचारी आहेत. अशी माहिती उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी दिली.

फलटण व पाटण तालुक्यातील 100 टक्के शाळा सुरू झाल्या असून महाबळेश्‍वर येथील 60 टक्के शाळा सुरू आहेत. उर्वरीत तालुक्यात सुरू असलेल्या शाळांची संख्या 90 टक्के आहे. अद्याप सरू न झालेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी गुरूवार दि.10 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने घेतली. त्यास सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थित होते. तर महाबळेश्‍वर तालुक्यातील मुख्याध्यापकांची समक्ष बैठक बुधवार दि.09 रोजी घेण्यात आली. बैठकीत कोविडचे सर्व नियम पाळून व आवश्यक ती काळजी घेवून शाळा सुरू करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. या बाबत आवश्यकतेनुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेण्यास सांगीतले. बंद असलेल्या शाळांपैकी काही शाळा पुढील आठवडयात सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरीत सर्व शाळा जानेवारीच्या पहिल्या आठपडयापर्यंत सुरू होतील असा अंदाज आहे.

 


आतापर्यंत 44 टक्के पालकांचे संमतीपत्र प्राप्त झाले आहे.संमतीपत्रे प्राप्त होण्याची गती संथ आहे. महत्वाच्या विषयाचा अध्यापनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून संमतीपत्र आवश्यक आहे. त्यामुळे पालकांचे समुपदेशन करुन कोवीडची भिती कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना सुचना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने एस.टी.च्या विभाग नियंत्रकाशी पत्रव्यवहार केला आहे. मुखपट्टीचा वापर, स्वच्छता आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचे पालन करुन शाळा सुरु आहेत. 

 राजेश क्षीरसागर,
माध्यमिक शिक्षणाधिकारी