sports

विटा येथे 28 ऑगस्टपासून सोमवार पर्यंत जनता कर्फ्यु

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांचा एकत्रित निर्णय

लोकडाउन शक्य नसून कायदेशीर अडचण असल्याचे नमूद करत. विविध संघटनांची व्यापक बैठक झाली यात विटा शहरात शुक्रवार ते सोमवार अखेर पूर्ण पणे जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन करण्याचा निर्णय झाला - तहसीलदार ऋषिकेश शेळके
खानापूर तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विटा शहरात शुक्रवार ते सोमवार चार दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन विविध संघटनांनी एकत्र येत केले आहे. यासाठी विटा बचाव समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, डायमंड कल्चरल ग्रुपचे संस्थापक शंकर मोहिते, भाजप शहराध्यक्ष अनिल म. बाबर, राजलक्ष्मी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. शंकर बुधवाणी, शिवसेना शहरप्रमुख राजू जाधव, अमित भोसले, विकास जाधव यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत दिलेली माहिती अशी, खानापूर तालुक्यात आणि विटा शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. गेल्या आठवड्यात तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर विट्यातील विविध राजकीय, सामाजिक, संघटना आणि क्रीडा मंडळे इत्यादीनी एकत्र येऊन विटा कोरोना बचाव समिती स्थापन केली आहे. या समितीच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून तालुका प्रशासनाकडे सातत्याने विटा शहरा मध्ये लॉक डाऊन लागू करण्याची मागणी होत होती. परंतु तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी लोकडाउन शक्य नसल्याचे सांगत कायदेशीर अडचण असल्याचे नमूद केले. यावर आज दुपारी या समितीची व्यापक बैठक झाली यात विटा शहरात शुक्रवार ते सोमवार अखेर पूर्ण पणे जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन करण्याचा निर्णय झाला. याकाळात अत्यावश्यक सेवा देणारी मेडिकल स्टोअर्स शहरातील दोन मोठी अतिदक्षता हॉस्पिटल्स वगळता सकाळी अकरा ते दुपारी पाच या वेळेतच सुरू राहतील, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे, अशी माहिती स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली. तातडीच्या औषधासाठी केमिस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष उपलब्धता करून देतील, त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. विटा कोरोना बचाव समितीचे कार्याध्यक्ष माधव रोकडे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. शहरात ग्रामीण रुग्णालय आणि आयटीआय जवळील कोविड सेंटर, ओमश्री वगळता अन्यत्र कोठेही कोविडवर उपचार करणारे मोठे रुग्णालय नाही. त्यातच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर यांची कमतरता पाहता कोरोना रुग्णांची साखळी तोडणे एवढेच आपल्या हातात आहे. सांगली जिल्ह्यातील जवळपास सर्वच कोविड रुग्णालयांमध्ये बेड आणि त्या अनुषंगाने इतर यंत्रणा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण हा पर्याय निवडत आहोत. विट्यातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी या निर्णयाला पाठींबा दिल्याचे सांगितले. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष सुनील सुतार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, टायगर ग्रुपचे तालुका उपाध्यक्ष सुजित जानकर, काँग्रेसचे प्रशांत पाटील, गजानन सुतार, डायमंड कल्चरल ग्रुपचे विनोद पाटील, आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे पांडुरंग पवार, केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भरत सावंत, महेश बाबर, रोहित पवार, कांतीलाल जोगड, सुहास माळी, शाबीर मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.