sports

कृष्णा कारखान्याचे ऐतिहासिक विक्रमी गाळप

एकाच दिवसात 9200 मे. टन ऊसाचे गाळप करून केला नवा उच्चांक

2020 हे वर्ष संपूर्ण जगाला कोरोनामुळे त्रासदायक ठरले. कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले. मात्र कृष्णा कारखान्याने अशा परिस्थितीतही चांगले गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर संकटातून वाटचाल करत जानेवारी 2020 ते आजअखेर सलग 3 वेळा एकदिवसीय विक्रमी गाळप केले. 1 जानेवारी 2020 यादिवशी 9020 मे. टन ऊस गाळप करण्यात आले. 12 डिसेंबर 2020 रोजी 9000 मे. टन ऊस गाळप केले, तर डिसेंबर महिन्यातच 14 डिसेंबर 2020 रोजी 9200 मे. टन इतके विक्रमी गाळप करण्यात आले आहे.
शिवनगर : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने या गळीत हंगामात 14 डिसेंबर रोजी 9200 मेट्रिक टन इतके सर्वोच्च गाळप करत, कारखान्याच्या इतिहासातील एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाच्या कारर्किदीत एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रम सहाव्यांदा केला असून, सोमवारी कारखान्याच्या 61 वर्षाच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाल्याने ‘कृष्णा’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
http://emuktagiri.in/upload/post/18d144fb79.jpg
कृष्णा कारखान्याने या हंगामात आजअखेर प्रतिदिन सरासरी 8000 मेट्रिक टनाहून अधिक क्षमतेने 2 लाख 70 हजार मे. टन ऊसाचे गाळप केले असून, 3 लाख 10 हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. दिवसाचा साखर उतारा 12.11 टक्के असून, सरासरी साखर उतारा 11.21 टक्के इतका आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी विविध हंगामात तब्बल 5 वेळा एका दिवसात सर्वोच्च गाळपाचा विक्रम झाला आहे. तसेच कृष्णेच्या शेतकर्‍यांनी राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादनाचे राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षात कारखाना कामकाजात पारदर्शकता आणली आहे. कारखान्यास आर्थिक शिस्त लावली आहे. कारखान्याच्या शेतकी विभागाने नियोजनबध्द तोडणी यंत्रणा राबविली आहे.
यांत्रिकीकरणावर भर देत कारखान्याची तोडणी यंत्रणा हार्वेस्टर मशिनने सुसज्ज केल्याने, शेतकर्‍यांना वेळेत तोड मिळत आहे. तसेच मोफत साखर, शेतकरी संवाद मेळावे, वाकुर्डे योजनेसाठी अर्थसहाय्य व 81-19 योजनेत कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा समावेश करावा यासाठी प्रयत्न व त्यास यश, सुसज्ज कृषि महाविद्यालय, द्रवरूप जिवाणू खत प्रकल्प उभारणी, जयवंत आदर्श कृषि योजना, एकरी 100 टन उत्पादन ऊसविकास योजना, कारखाना व डिस्टलरीचे आधुनिकीकरण, कर्मचारी कल्याण योजनेची प्रभावी अंमलबजावणी, यासारखे सभासद हिताचे निर्णय कारखाना संचालक मंडळाने राबविले आहेत. विक्रमी गाळप केल्याबद्दल कारखान्याच्या संचालक मंडळाकडून अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले.