मायणीत चार दिवसांत 41 जण कोरोनाबाधित
एकूण रुग्णसंख्या 106 : मायणीसह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण
कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याने बाजारपेठेत होणार्या गर्दीने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बेरजेने वाढणारा आकडा आता गुणाकाराने दुपटीने वेगाने वाढू लागला आहे. यामध्ये मायणीत चार दिवसांत 41 बाधितांची अचानक भर पडल्याने कोरोनाबाधितांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे मायणीसह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मायणी : कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याने बाजारपेठेत होणार्या गर्दीने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बेरजेने वाढणारा आकडा आता गुणाकाराने दुपटीने वेगाने वाढू लागला आहे. यामध्ये मायणीत चार दिवसांत 41 बाधितांची अचानक भर पडल्याने कोरोनाबाधितांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे मायणीसह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
तसेच दिवसेंदिवस वाढणार्या कोरोनाबाधितांमुळे आजच्या स्थितीला लोकांना उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील झाले आहे. मायणीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी टप्पा पार केला असून, एकूण रुग्णसंख्या 106 झाली आहे. तर काहींचा मृत्यू ही झाला असल्याने गंभीर रुग्णांवर मायणी मेडिकल कॉलेजमध्ये तर कमी लक्षणे व त्रासाचे प्रमाण कमी असणार्या रुग्णांवर होम आयसोलेशन पद्धतीने उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांत अचानकच माळीनगर घाडगेवस्ती, दाट लोकवस्तीचे सराटेमळा, नवीपेठ, विठोबा मंदिर परिसर, दगडेमळा, ढवळेवस्ती, पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोठ्या संख्येने सातत्याने रुग्ण सापडल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून मायणीमध्ये ‘जनता कर्फ्यू’च्या माध्यमातून चार दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. परंतु बंद पाळूनही रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, आता कोरोनाच्या अटकावासाठी आणखी उपाययोजना काय? यातून मुक्तता कशी होणार, हा यक्ष प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
लोकप्रतिनिधींनी आरोग्य सुविधांबाबत पाठपुरावा करण्याची गरज
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना या महामारीतीतून बाहेर काढण्यासाठी स्वतः फिरत आहेत. पालकमंत्री तर कोरोनावर मात करून पुन्हा जनतेच्या सेवेत दाखल झाले. परंतु, खटाव-माणचे लोकप्रतिनिधी, बडे चेहरे आज मतदारसंघातील महत्त्वपूर्ण असणार्या मायणी सारख्या गावात वाढणार्या संख्येमुळे भयभीत झालेल्या मतदारराजाला दिसेनासे झालेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी कोरोनाची भयावह परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य सुविधेसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.


