भारत-चीन तणाव: युद्धसामग्रीचा १५ दिवसांचा साठा करण्याची सैन्यदलांना परवानगी
By esahas.com web team Mon 14th Dec 2020 08:07 am
नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये (Ladakh) भारत आणि चीनदरम्यान तणावाचे (India-China Standoff) वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सैन्यदलाला १५ दिवसे पुरेल इतके हत्यारे, तोफगोळे इत्यादी युद्धसाहित्याचा साठा वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ही सर्व सामग्री विदेशी कंपन्यांकडून खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी ५० हजार कोटींहून अधिक पैसा खर्च केला जाण्याची शक्यता आहे. या पूर्वी सैन्यदल १० दिवस पुरेल इतका युद्धजन्य सामग्रीचा साठा करत आले आहे. मात्र या वेळी कमीतकमी १५ दिवसांचा साठा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. चीन आणि पारिस्तानकडून दोन्ही आघाड्यांवर युद्धाच्या स्थिती उद्भवल्यास भारतीय सैन्यदल तयार असावे यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, शत्रू देशांशी १५ दिवसांच्या गहन युद्धासाठी पुरेल इतकी युद्ध सामग्री गोळा केली जात आहे. आता हा साठा १० दिवसांवरून १५ दिवसांचा करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी ऑथरायझेशनअंतर्गत सैन्यदलांना ४० दिवसांच्या युद्धासाठी युद्धसामग्री साठवून ठेवण्याची परवानगी होती. मात्र नंतर यु्द्ध सामग्री साठवणुकीच्या समस्या आणि युद्धाची बदलती स्थिती पाहता ही मर्यादा १० दिवसांपर्यंत करण्यात आली.
आपली युद्धसामग्रीचा साठाच खूपच कमी असल्याचे उरी दहशतवादी हल्ल्यानंतर लाक्षात आल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तिन्ही सैन्यदलांची वित्तीय क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला. ती १०० कोटींवरून वाढवून ५०० कोटी इतकी करण्यात आली. तसेत तिन्ही सैन्यदलांना आणीबाणीच्या काळात ३०० कोटी रुपयांपर्यंतची युद्धसामग्री खरेदी करण्याची परवानगी देखील देण्यात आली.