maharashtra

जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्‍यांविरोधात सायरन आंदोलन

आम आदमी पक्षाची गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी

जावली तालुक्यातील अवैध दारुविक्रीमुळे नागरिकांच्या संसाराची वाताहात होत आहे. या अवैध धंदेवाल्यांविरोधात आम आदमी पक्षाने दंड थोपटले असून येत्या 10 एप्रिलपर्यंत हे धंदे बंद न झाल्यास आम आदमी पक्षाच्यावतीने पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायरन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सातारा : जावली तालुक्यातील अवैध दारुविक्रीमुळे नागरिकांच्या संसाराची वाताहात होत आहे. या अवैध धंदेवाल्यांविरोधात आम आदमी पक्षाने दंड थोपटले असून येत्या 10 एप्रिलपर्यंत हे धंदे बंद न झाल्यास आम आदमी पक्षाच्यावतीने पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायरन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भोगावकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवदेनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम दारुबंदी राबविणार्‍या जावली तालुक्यात चक्क दारुचा महापूर वाहत आहे. मात्र याबाबत पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ असून याविरोधात कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याच जिल्ह्यात हा गोरखधंदा चालू असल्याने सर्वसामान्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दारुच्या बाटलीच्या मूळ किंमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट भावाने येथे सर्रास दारुविक्री केली जात आहे. दारुच्या व्यवसायातून भरपूर पैसा हाती पडत असल्याने या धंद्याकडे व्यावसायिकांचा कल वाढतच चालला आहे. धंदा सुरु ठेवण्यासाठी खाकी ला गोंजारावे लागते. त्यापद्धतीने येथील पोलिसांचेही हप्ते बांधले गेले आहेत. शिवाय एखादी टुकार कारवाई दाखवून हे लोक वरिष्ठांकडून आपली पाठ थोपटून घेत असतात, हे वेगळेच. म्हणजेच दोन्ही बाजुंनी यांचीच सरशी झाल्याचे चित्र सध्या जावली तालुक्यात दिसत आहे.
जावलीतील रणरागिनींनी मतदानाच्या, आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यातील उभी बाटली आडवी केली. मात्र काही दुष्प्रवृत्तींनी काही खाकीधारकांना हाताशी धरुन आडवी बाटली कधी उभी केली हे कोणाला कळालेच नाही. त्यामुळे येथे तळीरामांना सहजरित्या दारु उपलब्ध करुन देणार्‍या आणि हजारो परिवारांची यामाध्यमातून वाताहत करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात यावे. जेणेकरुन येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. येथे होणार्‍या कारवाया या जुजबी स्वरुपाच्या असल्याने कारवाई झाल्यानंतर केवळ एकच दिवसात पुन्हा तो अवैध धंदेवाईक आपला धंदा उभा करतो आणि सुरु होतो, पुन्हा अवैध दारुचा प्रवास. यासाठी येथे सक्षम अधिकारी नेमण्यात यावा. जावली तालुक्यात परवानाधारकच ‘माल’ टाकत असल्याने परवानाधारकांवरही कडक कारवाई करुन त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा. याचबरोबर कारवाई करण्यात आलेल्यावर मोक्का अथवा तडीपारी सारखी कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरुन संपूर्ण जावली तालुक्यात अवैध दारुविक्री करण्यास कोणी धजावणार नाही.
येत्या 10 एप्रिलपर्यंत जावली तालुक्यात चालणारे बेकायदेशीर धंदे बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायरन वाजवून आम आदमी पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन त्यास जबाबदार राहील, असाही इशारा या निवेदनाद्वारे सरदार (सागर) भोगांवकर यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बाचल, रतन पाटील, जिल्हा खजिनदार विजयकुमार धोतमल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती शिंदे, जिल्हा सल्लागार सदस्य एडवोकेट मंगेश महामुलकर, जिल्हा सचिव मारुती जानकर, शहराध्यक्ष जयराज मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.