विद्यार्थ्यांची दृष्टी विशाल करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा
ज्येष्ठ कवयित्री साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांची अपेक्षा; कन्याशाळेच्या शताब्दी वर्षाची शानदार सांगता
विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे शालेय शिक्षण ही त्यांची अंतिम जाणीव नाही. त्या जाणीवांपलीकडची समृद्धता आणि त्याची व्यापक वैचारिक दृष्टी तयार करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री डॉ. अरुणाताई ढेरे यांनी व्यक्त केली.
सातारा : विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे शालेय शिक्षण ही त्यांची अंतिम जाणीव नाही. त्या जाणीवांपलीकडची समृद्धता आणि त्याची व्यापक वैचारिक दृष्टी तयार करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री डॉ. अरुणाताई ढेरे यांनी व्यक्त केली.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्या शाळेच्या शताब्दी समारोहाच्या सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपाध्यक्ष विद्याताई कुलकर्णी, कार्यकारणी संचालक जयंत इनामदार, सीमाताई कांबळे, सचिव अभय कुलकर्णी, उपसचिव पी. व्ही. एस. शास्त्री, संचालक प्रदीप वाजे, शाळा समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात, समिती सदस्य प्रभाकर सोनपाटकी, सन्माननीय संचालक प्रद्युम आगटे, अवधूत नाटेकर, सविता काजरेकर, वृंदा शिवदे, संस्थेच्या आजन्म सेविका डॉ. समीक्षा निकम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा दौंडे, उप मुख्याध्यापक कृष्णकांत केंगार, पर्यवेक्षक प्रवीण काळे, नारायण कुटे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या, शालेय अभ्यासक्रमाची चौकट ओलांडून विद्यार्थ्यांचा चौफेर विकास घडवण्याच्या दृष्टीने शिक्षकांचे प्रयत्न असायला हवेत. मुलांची दृष्टी विशाल करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनासाठी वेळोवेळी शिक्षकांनी उपलब्ध असायला हवे. ज्ञान व माहिती यात फरक असून विवेकाने त्याचा वापर करणे गरजेचे आहे. व्यक्तीचा भावनिक तसेच आंतरिक विकास होणे गरजेचे असून त्याकरिता वैचारिक प्रगल्भता निर्माण करणे आणि त्यातून विचारांचे भान असताना समाज निर्माण करणे ही खरी शिक्षकांची जबाबदारी आहे. व्यक्तीने वयाचे शतक गाठले तर तो शरीराने कमकुवत होतो. पण एखाद्या संस्थेने जर शतक गाठले तर तिच्या कार्याचा विस्तार होतो. त्या कामाच्या आंतरप्रेरणेची जाणीव सतत संस्थेच्या सभासदांना असली पाहिजे, अशी अपेक्षा अरुणाताई यांनी यावेळी व्यक्त केली.
झांज पथकाच्या गजरात यावेळी मान्यवरांचे स्वागत झाले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शताब्दी वर्षात झालेल्या विविध कार्यक्रमांची चित्रफित यावेळी सादर करण्यात आली. ईशस्तवन आश्रम गीत सादर करून कार्यक्रम पुढे सादर करण्यात आला. वर्षभराचा आढावा आणि कार्यक्रमाचे प्रास्तावित प्राचार्य सुरेखा दौंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपशिक्षिका संगीता हेंद्रे यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र देव यांचा परिचय अमोल क्षीरसागर यांनी करून दिला. डॉक्टर अरुणाताई ढेरे यांचा विशेष सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांच्या हस्ते करण्यात आला. शाल, श्रीफळ, महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. देव यांचा सत्कार शाळा समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी केला. कन्या शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण विषयक विचारांचे महत्त्व आजही कायम असून ते विचार आपण सातत्याने पुढे नेले पाहिजे, अशी अपेक्षा रवींद्र देव यांनी मनोगतात व्यक्त केली.


