maharashtra

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा


Relief to project affected farmers due to the efforts of Srinivas Patil
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधा-यांच्या भूसंपादन मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी सातारा विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कराड : खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधा-यांच्या भूसंपादन मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी सातारा विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथे जलसंधारण विभागाकडून सुमारे 38 हेक्टर हद्दीत जमिन भूसंपादन करून बंधारा बांधला आहे. यासाठी स्थानिक शेतक-यांची जमिन संपादित करण्यात आली असून भूसंपादित शेतक-यांसाठी निधीही मंजूर करण्यात आले असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. सन 2010 ला सुरूवात झालेला हा प्रकल्प 2014 साली ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण झाला आहे. मात्र संबंधित भूसंपादित शेतक-यांना अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी होती. यासंदर्भात संबंधित शेतक-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन हा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेत खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि महाराष्ट्र जलसंधारण विभागाचे कार्यकारी संचालक सुनिल कुशिरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून शेतक-यांना हा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली होती. तर खा.श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येळगावचे सरंपच मन्सुर इनामदार, गोटेवाडीचे सरपंच डाॅ.विलासराव आमले, येळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन साळुंखे, बाळकृष्ण कुंभार, सुरेश पाटील व सर्जेराव शेवाळे यांनी सुनिल कुशिरे यांची भेट घेतली होती.
भेटीदरम्यान मोबदल्यापोटी निधी संदर्भात व तलावाच्या अनुशंगाने अन्य प्रलंबित समस्या बाबत निवेदन देण्यात आले होते. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून सदर शेतक-यांना मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजार 661 रूपयाचा धनादेश मंजूर झाल्याचे सुनिल कुशिरे यांनी खा.पाटील यांच्या कार्यालयास कळविले आहे. हा निधी वर्ग झाल्याने येळगाव व गोटेवाडी बंधा-यांच्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल संबंधित शेतक-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांचे आभार मानले आहेत.