सातारा पालिकेचे राज्य संवर्गातील कर्मचारी बदलीच्या प्रक्रियेमध्ये असून या संदर्भातील बदल्यांचे आदेश लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील विनंती बदल्यांचे अर्ज नगर विकास विभागाने सरळसेवा पोर्टलच्या माध्यमातून भरून घेतले आहेत. गेले तीन वर्ष सातारा नगरपालिकेला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ऐन निवडणुकीच्या काळात बदल्या होणार असल्याने दैनंदिन कामे ठप्प होणार आहेत.
सातारा : सातारा पालिकेचे राज्य संवर्गातील कर्मचारी बदलीच्या प्रक्रियेमध्ये असून या संदर्भातील बदल्यांचे आदेश लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील विनंती बदल्यांचे अर्ज नगर विकास विभागाने सरळसेवा पोर्टलच्या माध्यमातून भरून घेतले आहेत. गेले तीन वर्ष सातारा नगरपालिकेला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ऐन निवडणुकीच्या काळात बदल्या होणार असल्याने दैनंदिन कामे ठप्प होणार आहेत.
सातारा पालिकेचे एकूण आस्थापनेवरील 445 कर्मचाऱ्यांपैकी 29 कर्मचारी हे राज्य संवर्गातील आहेत. राज्य संवर्गामध्ये संबंधित पालिका क्षेत्रात तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष पूर्ण केलेल्या 30 टक्के कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये आकस्मिक परिस्थिती म्हणून नगर विकास विभागाने पालिका अंतर्गत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या होत्या. मात्र संसर्गदर अगदीच शून्यावर आल्याने खाते अंर्तगत बदल्यांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पालिकेच्या 29 पैकी 30 टक्क्यांच्या निकषांमध्ये एकूण आठ कर्मचाऱ्यांची बदली होणार आहे. यामध्ये न्याय व कक्ष विभागाचे प्रमुख अरविंद दामले, आस्थापना विभागाच्या हिमाली कुलकर्णी, सभा सचिव विभागात काम करणाऱ्या प्रमुख रंजना भोसले, सहाय्यक लेखापाल एकनाथ गवारी, सहायक लेखा अधिकारी हिम्मत पाटील, अंतर्गत लेखा परीक्षक कल्याणी भाटकर त्याचबरोबर बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता एस. एस. साबळे, वसुली विभागाचे अधीक्षक प्रशांत खटावकर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती आहे.
या कर्मचाऱ्यांनी सरळ सेवा पोर्टल द्वारे बदली प्रक्रियेची तांत्रिक माहिती अपडेट केली असून नगरविकास विभागाकडून येत्या 31 मे पर्यंत या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देणार आहेत. या कर्मचाऱ्यांना जिल्हा कार्यक्षेत्र किंवा कार्यक्षेत्र जिल्ह्याच्या बाहेर बदली मिळणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मनुष्यबळ विस्थापित होत असल्याने काही काळासाठी तातडीची कामेही ठप्प होणार आहेत. नवीन कर्मचाऱ्यांचे बदली आदेश लवकरच नगर विकास विभागाच्या उपसचिव म्हणून जाहीर केले जाणार आहेत. सातारा पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःहून बदली मागून घेतली असल्याने एकूणच येथील कामकाज प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


