क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले संघर्ष गौरव पुरस्काराचे 9 रोजी साताऱ्यात वितरण
अॅड. वर्षा देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा समोर ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार 6000 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या डॉक्टर पी. डी. जोशी पाटोदेकर नांदेड यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार समारोह समितीच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.
सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा समोर ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार 6000 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या डॉक्टर पी. डी. जोशी पाटोदेकर नांदेड यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार समारोह समितीच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.
दिनांक 9 मार्च रोजी शाहू कला मंदिर येथे भव्य महिला मेळाव्यात या संघर्ष पुरस्काराचे वितरण मुंबई येथील सितारा संस्थेचे संचालक डॉक्टर प्राध्यापक सतीश अग्निहोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला पत्रकार प्रगती बाणखेले यांच्या हस्ते होणार आहे.
या पुरस्काराविषयी माहिती देताना वर्षा देशपांडे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने काम करणारे कार्यकर्त्याला किंवा संस्थेला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मात्र आधी कोरोनाच्या संसर्गामुळे हे कार्यक्रम लांबणीवर पडले होते. या पुरस्कार समितीत गौरी जावळे, मीना शिंदे, शैलेंद्र पाटील, राजू मुळ्ये, कैलास जाधव, प्रगती पाटील, प्राध्यापिका सुवर्णा कांबळे, मनिषा कूपर, उमा साळुंखे, प्राध्यापक संजीव बोंडे, प्राध्यापक दत्ताजीराव जाधव, प्राध्यापक भाई माने, प्राध्यापिका समता माने, एडवोकेट वनराज पवार, एडवोकेट वर्षा देशपांडे, ॲड. शैला जाधव यांनी समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
नांदेड येथील प्रसिद्ध डॉक्टर पी. डी. जोशी यांची यंदा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. युवक क्रांती दलाचे सक्रिय सदस्य असणाऱ्या जोशी यांनी सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने बालकामगारांच्या प्रश्नामध्ये लक्ष घातले वाड्या वस्त्यांवर जाऊन बाल कामगार शोधले आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. या कामगिरीची नोंद घेऊनच त्यांना यंदाच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले संघर्ष समितीने यापूर्वी अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार माया वानखेडे, विलास बडे, पारोमिता गोस्वामी, शिर्डीचे कैलास बापू कोते पाटील आदी मान्यवर यांचा यामध्ये समावेश आहे. संस्थेच्या वतीने 2018साली सातारा जिल्ह्यातील महिला संघटक महिलांना हक्काची जाणीव करून दिल्याबद्दल श्यामसुंदर सोन्नर महाराज यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. 2019 यावर्षी अहमदनगर येथील आधार संस्थेला 498 अ कायद्यातील बदल पूर्ववत करण्यासाठी सुप्रीम कोर्टातील लढाई यशस्वी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. 2020 ला तिरुअनंतपुरम केरळ येथील शांतिगिरी आश्रम ला हा पुरस्कार देण्यात आला, तर 2019 रोजी कोरोना दरम्यान अखंड वैद्यकीय सेवेबद्दल डॉक्टर मेघा देशपांडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
9 मार्च रोजी शाहू कला मंदिर येथे दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे निमंत्रक एडवोकेट वर्षा देशपांडे यांनी केले आहे.


