maharashtra

नयपद्मसागर महाराजसाहेब यांनी केलेले कार्य आदर्शवत : पृथ्वीराज चव्हाण


जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन व जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या जैन समाजाच्या सर्वोच्च संस्थांचे संस्थापक व प्रेरणास्थान नयपद्मसागर महाराजसाहेब यांना जैन धर्मातील सर्वोच्च मानले जाणारे आचार्यपद प्रदान करण्याचा दिमाखदार सोहळा मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.

मुंबई : जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन व जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या जैन समाजाच्या सर्वोच्च संस्थांचे संस्थापक व प्रेरणास्थान नयपद्मसागर महाराजसाहेब यांना जैन धर्मातील सर्वोच्च मानले जाणारे आचार्यपद प्रदान करण्याचा दिमाखदार सोहळा मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. जैन समाजाच्या उद्धारासाठी नयपद्मसागर महाराजसाहेब यांनी केलेले कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रसंगी काढले.
महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रसंत आचार्य पद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांनी नूतन आचार्य नयपद्मसागर महाराजसाहेब आणि प्रशांतसागर महाराज यांना आचार्यपद प्रदान केले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. त्यांनी यावेळी नयपद्मसागर महाराजसाहेब यांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. सोहळ्याला पाचशे साधू - साध्वींसह हजारो जैन बांधव उपस्थित होते.
नूतन आचार्य नयपद्मसागर सुरीश्वर महाराज यांनी धार्मिक कार्यापलीकडे जाऊन जैन समाजाच्या उद्धारासाठी शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण, स्पर्धा परीक्षा आदी विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व अद्ययावत मूलभूत सोयी सुविधा, आर्थिक पाठबळ त्यांनी उपलब्ध करून दिल्याने समाजातील उच्च पदावर जाणाऱ्या बांधवांची संख्या वाढत आहे. कित्येक जण आयएएस, आयआरएस तसेच न्यायाधीश झाले आहेत. जैन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीत महाराज साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.

आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च बोली
जैन समाजाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने बोली लावण्याची पद्धत आहे. त्यातून खर्चाचे नियोजन केले जाते. अधिकच्या पैशाचा विनीयोग कसा करायचा, याचेही नियम आहेत. या आचार्य पद प्रदान सोहळ्याच्या निमित्तानेही तशा बोली लावल्या गेल्या होत्या. एकत्रितरीत्या त्या ५६ कोटींच्या आसपास गेल्या. विशेष म्हणजे आचार्यपद प्रदान सोहळ्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातील या सर्वोच्च बोली ठरल्या आहेत.