maharashtra

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही

पद्मश्री लक्ष्मण माने यांची पत्रकार परिषदेत टीका

BJP has no moral right to criticize Sharad Pawar
शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपाला नाही. पाथरवट नावाची जी कविता जवाहर राठोड या कवीने रचली त्याचे निरूपण पवार यांनी केले. यामध्ये कोणाला दुखण्याचा प्रश्नच येत नाही. कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.

सातारा : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, असे ट्विट भाजपच्या वतीने करण्यात आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. या प्रकरणात शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपाला नाही. पाथरवट नावाची जी कविता जवाहर राठोड या कवीने रचली त्याचे निरूपण पवार यांनी केले. यामध्ये कोणाला दुखण्याचा प्रश्नच येत नाही. कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना माने पुढे म्हणाले, "नऊ मे रोजी भटके-विमुक्त जाती जमाती संस्थेच्या वतीने पत्रकार निखिल वागळे यांना फुले आंबेडकर पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी जवाहर राठोड या कवीची पाथरवट नावाची कविता वाचून दाखवत त्यावर निरूपण केले होते. या कवितेच्या माध्यमातून पवारांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला, अशी वादग्रस्त टीका भाजपने केली. अर्थात त्यांना पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. या कवितेचा कोणताही राजकीय अर्थ लावला जाऊ नये. भाजप महाराष्ट्रामध्ये तोडा आणि फोडा हे तंत्र अवलंबून येत्या निवडणुकांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांचा गनिमी कावा हा बहुजन समाजाने तातडीने ओळखावा, असे आवाहन माने यांनी केले.
हिंदू हा शब्द कोणत्याही उपनिषदांमध्ये नाही. त्याचा पहिल्यांदा उल्लेख 1861 च्या ब्रिटिशांनी तयार केलेल्या गॅझेटमध्ये झाला होता. ब्राह्मण हे सुद्धा भारतीय नाहीत, ते वैदिक आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आपण हिंदू ब्राह्मण आहोत, असे प्रमाणपत्र दाखवावे. ते दाखवू शकणार नाहीत. बहुजन समाजाला सातत्याने उपेक्षेच्या अंधारात ठेवून स्वतःलाच पुढे आणण्याचा कारस्थानी कावा गेल्या आठशे वर्षापासून ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय या तीन जमातींनी केला आहे. त्यामुळे खैबर खिंडीतून आलेल्या या परकीय लोकांनी बहुजन समाजाला महाराष्ट्रातील लोक जीवनाची सांस्कृतिक जडणघडणीची अक्कल शिकवू नये, असे जळजळीत वक्तव्य लक्ष्मण माने यांनी केले.
पवारांच्या कविता वक्तव्याचे राजकीय अन्वयार्थ लावणारे हे संकुचित मनोवृत्तीचे आहेत.. या मनोवृत्तीला आत्ताच विरोध झाला पाहिजे. असे जर झाले नाही तर ब्राम्हण लोकांच्या कटकारस्थाने ला बहुजन समाजाचे तरुण बळी पडतील. हिंदू हा शब्द गुलामीचे प्रतीक आहे. तो शब्द आपण आत्ताच झुगारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.