जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात शिवसैनिकांचा ठिय्या
शंभर रुपयांच्या शिधासंचाचे वाटप होणार कधी ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शंभर रुपयांमध्ये एक किलो पामतेल, एक किलो साखर, एक किलो रवा आणि एक किलो डाळ असा शिधा संच 100 रुपयात देण्याची योजना जाहीर केली होती.
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शंभर रुपयांमध्ये एक किलो पामतेल, एक किलो साखर, एक किलो रवा आणि एक किलो डाळ असा शिधा संच 100 रुपयात देण्याची योजना जाहीर केली होती. सातारा जिल्ह्यामध्ये या योजनेचा बोजवारा उडाल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.
जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे इत्यादी कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांच्या दालनात संबंधित योजना योग्य रीतीने कार्यान्वित का होत नाही ? असा जाब विचारला. शिधा संच वाटपाचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. पणन महामंडळाकडून यासंदर्भातील खरेदीसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र साखर आणि पामतेल पोहोचले असून अद्याप दोन शिधा वस्तू प्राप्त झाल्या नसल्याचे स्नेहा किसवे देवकाते यांनी सांगितले.
शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शिधा संच वाटपाचे योग्य वाटप होत नसल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयात आनंदाचे कीट देण्याचे निर्णय घेतला. मात्र सातारा जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने राशन दुकानदारांना अद्याप हे दिवाळी किट पोहोचले नाही. प्रशासनाचा आनंदाचा शिधा दिवाळीच्या मुहूर्तावर गरिबाच्या घरी आणून देणार का, असा जाब त्यांनी विचारला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा काम करत असून दिवाळीच्या आधी हे कीट पोहचेल, असे आश्वासन शिवसैनिकांना दिले.
सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल चार लाख लाभार्थी अंत्योदय योजनेअंतर्गत आहेत. चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे रेशनिंग दुकानदार दुकान बंद ठेवून हे कीट वाटप करण्याच्या कामात कसूर होईल अशी तक्रार शिवसैनिकांनी केली. मात्र त्यांना सलग कामावर राहण्याच्या सूचना देणार असल्याचे स्नेहा किसवे देवकाते यांनी सांगितले.


