नगरपालिकेकडून छत्रपती संभाजी मार्केटची स्वच्छता
नागरिकांच्या तक्रारीची दखल : पोलिसांच्या मदतीने पारध्यांनाही लावले हूसकावून
शहरातील छत्रपती संभाजी महाराज मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यापासून पारध्यांनी तळ ठोकला होता. तसेच त्यापरिसरात यांनी प्रचंड कचरा आणि घाण केली होती. त्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत नगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पालिकेने छत्रपती संभाजी मार्केट परिसराची स्वच्छता केली. तसेच त्याठिकाणी तळ ठोकून बसलेल्या पारध्यांनाही पोलिसांच्या मदतीने हूसकावून लावले आहे.
कराड : शहरातील छत्रपती संभाजी महाराज मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यापासून पारध्यांनी तळ ठोकला होता. तसेच त्यापरिसरात यांनी प्रचंड कचरा आणि घाण केली होती. त्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत नगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पालिकेने छत्रपती संभाजी मार्केट परिसराची स्वच्छता केली. तसेच त्याठिकाणी तळ ठोकून बसलेल्या पारध्यांनाही पोलिसांच्या मदतीने हूसकावून लावले आहे.
येथील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महामार्गावरील उड्डाणपुलाखाली पारध्यांनी तळ ठोकला होता. तसेच त्याठिकाणी त्यांनी कचरा आणि घाण केली होती. त्यामुळे पोलिसांनी गतवर्षी पारध्यांना सदर उड्डाणपुलाखालून हूसकावून लावले होते. त्यांनतर पारध्यांनी काही दिवसात संधी साधून शहरातील छत्रपती संभाजी मार्केटमध्ये तळ ठोकला होता. तसेच काही पारध्यांनी थोड्याच दिवसात पुन्हा कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाखालीच पुन्हा तळ ठोकला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज मार्केटमध्ये तळ थकलेल्या पारध्यांमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य विभागाला येथील हुसकावून लावत परिसराची स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नुकतेच आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांनी पोलिसांची मदत घेत मार्केटमधील पारध्यांना हुसकावून लावले. तसेच सदर परिसराची आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली.
तसेच या धडक कारवाईवेळी छत्रपती संभाजी महाराज मार्केटमध्ये विना परवाना व विनाकारण ठाण मांडून बसणार्या अनेकांना पालिकेने पोलिसांच्या मदतीने हुसकावून लावले. त्याचबरोबर अनेकजण याठिकाणी बेकायदेशीररित्या व्यवसाय, तसेच विनापरवाना अनेक दिवस साहित्यही ठेवत आहेत. शिवाय, अनेक वाहनेही मार्केटमध्ये पार्क केलेली असतात. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे मार्केटमधील व्यवसायिकांनी सांगितले. त्यामुळे सदर मार्केट बंदीस्त करावे, अशी मागणीही स्थानिक नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांकडून होत आहे. याकडेही नगरपालिकेने गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.


