अपुऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ राज्य इरिगेशन फेडरेशनचे साताऱ्यात धरणे
विद्युत सेवा पूर्ववत करण्याची मागणी
भुईंज फिडर, वाठार फिडर व कोरेगाव तालुक्यातील इतर फिडर ची विद्युत सेवा फेब्रुवारी महिन्यापासून दोन ते तीन तास मिळत आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने महाराष्ट्र वीज वितरणच्या कृष्णा नगर येथील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सातारा : भुईंज फिडर, वाठार फिडर व कोरेगाव तालुक्यातील इतर फिडर ची विद्युत सेवा फेब्रुवारी महिन्यापासून दोन ते तीन तास मिळत आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने महाराष्ट्र वीज वितरणच्या कृष्णा नगर येथील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सातारा जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष रणजीत फाळके, संपर्कप्रमुख अर्जित तांबे, कोरेगाव तालुका प्रमुख पृथ्वीराज बर्गे, धोम धरण संघर्ष समितीचे चंद्रकांत बर्गे, सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सहभाग घेतला होता. फेडरेशनचे सुमारे 100 सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी वीज वितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, भुईंज वाठार आणि कोरेगाव तालुक्यात शेतीपंपाची लाईट गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून दोन ते तीन तास मिळत आहे. 9 मार्च 2023 रोजी पत्रव्यवहार करून सुद्धा वीज सेवेबाबत उपाययोजना झालेली नाही. आठ तास रात्री, आठ तास दिवसा पूर्ण क्षमतेने वीज सेवा उपलब्ध होत नाही. महाराष्ट्र वीज वितरण कार्यालयाच्या तंत्र विभागाकडून या सेवेत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे.
भुईज फीडरची वीज पारेषण ची क्षमता 250 एम पी असताना या फिडरवर 375 mp3 भार पडतो. लाईन कंडक्टर जुना असल्याने सतत लाईन फॉल्टी होत आहेत. त्यामुळे भुईंज फिडर वरील लोड स्थलांतरित करावा, अशी मागणी करण्यात आली. भुईंज फीडर च्या ऐवजी देऊरला मंजूर झालेल्या सब स्टेशनचे काम पूर्ण करून ते लवकर चालू करावे व भुईजचा अर्धा लोड या सब स्टेशन वर टाकावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात भुईंज व वाठार फिडर व कोरेगाव तालुक्यातील इतर फिडरला रोज लाईट पूर्ण दाबाने आठ तास पूर्ण वेळ मिळावी. या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य एरिगेशन फेडरेशन कोल्हापूर व धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती यांच्यावतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. वीज वितरण विभागाला या संदर्भात 15 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.


