कोरेगाव वनीकरण विभागाने वर्धनगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पृष्ठभागावर चालू हंगामी पावसाळ्यात त्वरित वृक्ष लागवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.
पुसेगाव : कोरेगाव वनीकरण विभागाने वर्धनगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पृष्ठभागावर चालू हंगामी पावसाळ्यात त्वरित वृक्ष लागवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.
वर्धनगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पृष्ठभागावर व पश्चिमेकडील काही भागात वर्धनगड किल्ला हा झाडे नसल्या कारणाने पूर्णपणे रुक्ष दिसत असून वर्षानुवर्ष हा ऐतिहासिक किल्ला वृक्षलागवडीच्या प्रतीक्षेत आहे. गेली अनेकवेळा याबाबत कोरेगाव वनविभागाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून सूचित केले असतानाही या ठिकाणी वृक्षारोपण करण्यास दुर्लक्षित केले जात आहे. वर्धनगड खटाव हद्दीत येणाऱ्या वर्धनगड पायथ्यापासून येथील ग्रामपंचायत, तसेच वनीकरण विभाग, किल्ले वनसंवर्धन प्रेमी, तसेच शिवप्रेमीनी चार पाच वर्ष लगातार या डोंगर माथ्यावर वृक्षारोपण केले होते. त्यासाठी येथील वर्धनी विद्यालय, प्राथमिक केंद्र शाळा तसेच गावातील तरुण वर्गाचा मोठा सहभाग लाभला होता. परंतु या दोन-चार वर्षांमध्ये झाडे लावली. त्याच वर्षामध्ये पावसाने ओढ दिल्याने अनेक झाडे पाण्याविना व पावसाविना गेली. परंतु त्या कारकिर्दीमध्ये लागलेली झाडे त्यातील कमीत कमी 25 टक्के झाडे लागून निघाल्याने वर्धनगड लगत खटाव वनीकरण विभागाच्या हद्दीत येत असलेला उत्तर- पूर्वेकडील परिसर चांगलाच हिरवा झाला आहे. लावलेली काही झाडे मोठ्या प्रमाणात आली असून त्यामुळे वर्धनगड व वर्धनगड किल्ल्याचा वैभवात भर पडली आहे. सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे पर्यावरणाचा तोल ढासळला असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर अवेळी येणारा पाऊस हवामानातील बदल यामुळे वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असताना व शासनाचेही त्या पद्धतीने वृक्ष लागवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न व मदत करीत असताना देखील कोरेगाव वनीकरण विभाग या भागाकडे दुर्लक्षित का करीत आहे असा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. तरी या जून- जुलै महिन्यामध्ये कोरेगाव वनीकरण विभागाने वर्धनगड च्या दक्षिण पूर्व परिसरात वृक्ष लागवड तातडीने करावी, अशी मागणी वर्धनगड सह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.


