राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग झाला मोकळा
सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील; बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी आता उठवण्यात आली आहे. मात्र, या शर्यतींमध्ये पशू क्रूरती प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी आता उठवण्यात आली आहे. मात्र, या शर्यतींमध्ये पशू क्रूरती प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
उच्च न्यायालयाच्या याचिकेविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी पेटा या संस्थेकडून बाजू मांडण्यात आली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असे सांगत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत, या अटीवर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे.
बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकारवर प्रचंड दबाव होता. मध्यंतरी राज्यात काही ठिकाणी ही बंदी झुगारुन बैलगाडा शर्यती पार पडल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार, खासदार बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी आग्रही होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसाठी सर्वपक्षीय नेते एकटवले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे बैलगाडा चालक, मालक, शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. याचा पाठपुरावा करणारे शिवाजीराव अढळराव पाटील, अमोल कोल्हे यांसह राज्य सरकारमधील विविध मंत्री यांनीही आनंद व्यक्त केला आहे. जी सशर्त परवानगी दिली आहे, त्या नियमांचे पालन होईल, असे आवाहनही संबंधितांकडून बैलगाडा शर्यतप्रेमींना करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे.


