maharashtra

राजवाडा बसस्थानकावरील वादग्रस्त शिल्प तातडीने हटवा

श्रीमंत कोकाटे यांची पत्रकार परिषदेत मागणी

Immediately remove the controversial sculpture at Rajwada bus stand
राजवाडा बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांसमवेत असणारे रामदासांचे वादग्रस्त शिल्प प्रशासनाने तातडीने हटवावे अशी मागणी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. अनधिकृत शिल्पांची पोलिसांच्या उपस्थितीत उद़घाटने होतातच कशी ? प्रशासनाची या प्रकरणाला फूस आहे काय ? असा सवाल कोकाटे यांनी केला.

सातारा : राजवाडा बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांसमवेत असणारे रामदासांचे वादग्रस्त शिल्प प्रशासनाने तातडीने हटवावे अशी मागणी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. अनधिकृत शिल्पांची पोलिसांच्या उपस्थितीत उद़घाटने होतातच कशी ? प्रशासनाची या प्रकरणाला फूस आहे काय ? असा सवाल कोकाटे यांनी केला.
येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी राजवाडा बस स्थानकावरील रामदासांचे शिल्प प्रशासनाला हटविण्यासाठी एक महिन्यांची मुदत दिली. अन्यथा आम्हाला ते शिल्प हटवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी विद्रोही चळवळीचे सदस्य पार्थ पोळके, अमर गायकवाड, छात्र वीर सेनेचे अरबाझ शेख उपस्थित होते.
कोकाटे पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने खोटा इतिहास बहुजनांच्या माथी मारण्याचा उद्योग करतात. या अनधिकृत शिल्प उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका आधीच जाहीर असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका का घेतली ? सर्व इतिहासतज्ञांनी रामदास स्वामी या पात्राचे खंडन केले आहे. मग तो पुण्याचा दंगलखोर मिलिंद एकबोटे साताऱ्यात येऊन उद्घाटन कसे करतो, असा सवाल कोकाटे यांनी करत रामदासांचे शिल्प वादग्रस्त असल्याचे सांगत ते हटविण्याची मागणी केली. त्यासाठी आम्ही प्रशासनाला एक महिन्याची मुदत देतो. अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने हटवू, असा इशारा कोकाटे यांनी दिला.
पार्थ पोळके म्हणाले, रामदास स्वामीला संत का म्हणावे त्यांच्याविषयी अनेक वादग्रस्त संदर्भ उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा संबध छत्रपती शिवरायांशी जोडणे गैर आहे. साताऱ्यातील बसस्थानकात शिल्प का ठेवल आहे? रामदासांचे बसस्थानकातील शिल्प दोन चार दिवसात हटवल नाही तर आम्ही काढू असे ते म्हणाले. पोलीसांना माहीत असूनही उदघाटन झाले म्हणजे पोलिसांची याला मुकसंमती होती. पुरोगामी संघटना गेल्यावर्षी 20 डिसेंबर रोजी पुरोगामी संघटना प्रशासनाला भेटल्या होत्या. याला एक वर्ष झाले पण काहीच झालं नाही. याचा अर्थ दंगल व्हावी असं यांच म्हणणं आहे का ? पण आम्ही संविधानाला मानणारे आहोत.
 पालिकेने शिल्प हटवले नाहीत तर आम्ही शिवप्रेमी तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.