maharashtra

रिलायन्सचा व्याप, नागरिकांच्या डोक्याला नाहक ताप!

दोन दिवसांत काम बंद न पाडल्यास ‘मनसे’चा आंदोलनाचा इशारा

सातारा जिल्ह्यामध्ये सध्या रिलायन्स-जिओ या कंपनीचे फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम सार्वजनिक रस्त्यांच्या लगतच सुरु असून केबल टाकण्यासाठी कंपनीच्या ठेकेदाराने मोठमोठाल्ले खड्डे खोदल्यामुळे नागरिक, प्रवाशांना छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये सध्या रिलायन्स-जिओ या कंपनीचे फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम सार्वजनिक रस्त्यांच्या लगतच सुरु असून केबल टाकण्यासाठी कंपनीच्या ठेकेदाराने मोठमोठाल्ले खड्डे खोदल्यामुळे नागरिक, प्रवाशांना छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत आहे. तसेच ही सर्व कामे नियम धाब्यावर बसवून सुरु असल्यामुळे ही कामे त्वरित बंद करावीत, अशी मागणी ‘मनसे’ने सातारा जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, जिल्ह्यातील कोरेगाव तसेच सातारा तालुक्यात रिलायन्स-जिओ या कंपनीचे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. कोरेगाव तालुक्यातील सातारारोड, जळगांव, कोरेगाव शहर, सातारा तालुक्यातील वडूथ-आरळे, पाटखळ माथा व वाढे याठिकाणी सातारा-लोणंद रस्त्यावर रिलायन्स-जिओ ने ही केबल टाकण्याचे काम जोमाने सुरु केले आहे. यासाठी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच मोठ-मोठ्या मशिनद्वारे मोठ्या प्रमाणावर खुदाई केली जात आहे. या खुदाईमुळे चकचकीत डांबरी रस्ते उखडून टाकले जात आहेत. वास्तविक, नियमानुसार ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी करावे लागणारे उत्खनन हे रस्त्याच्या अकरा मीटर लांब अंतरावर करणे बंधनकारक आहे. देशातील इतर राज्यांमध्ये रिलायन्स-जिओ ने ऑप्टिकल फायबर केबलच्या खुदाईचे काम मुख्य रस्त्यापासून 11 मीटर अंतर सोडूनच केले आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात सर्व नियम धाब्यावर बसवून व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने रिलायन्स-जिओ च्या ठेकेदाराने थेट रस्त्यातच खुदाई सुरु केली आहे. बर्‍याच ठिकाणी हे काम पूर्णही झालेले आहे.
सध्या सातारा शहर परिसरात या ठेकेदाराने आपले काम जोमाने सुरु ठेवलेले आहे. या कामाकडे बघण्यात संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना स्वारस्य नाही. संबंधित ठेकेदार सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून सार्वजनिक रस्त्याच्या चिंध्या करीत आहे. हे बेकायदेशीर काम तत्काळ बंद करावे, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना दिले असून दोन दिवसांत हे बेकायदेशीर काम बंद न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोणीही या आणि टिचकी मारुन जा...
राज्यात अभूतपूर्व असे सत्तांतर झाले. जे सत्तेत होते, ते विरोधी बाकावर आले. गेल्या काही वर्षांमध्ये सातार्‍यातील पुढार्‍यांचा प्रशासनावर वचक असायचा. परंतू तो वचक काही प्रमाणात कमी झाला आहे. विविध विभागातील अधिकारी फारच शेफारलेले आहेत. ‘हम करे सो कायदा’ अशा अविर्भावात हे अधिकारी वावरत असतात. सातारा जिल्ह्यात रिलायन्स-जिओ चे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे शेकडो कि.मी. चे काम सुरु आहे. अर्थात हे काम बर्‍यापैकी पूर्ण झालेले आहे. नियमानुसार ऑप्टिकल फायबर केबल जमिनीत पुरण्यासाठी मुख्य रस्त्यांपासून हे खुदाईचे काम 11 मीटर अंतरावर करणे गरजेचे असते. मात्र ‘कॉस्ट कटिंग’च्या नादात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना ‘कटिंग’ देवून हे काम स्वस्तात पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने भन्नाट शॉर्टकट अवलंबला आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिक नेहमीच सोशिकतेच्या भूमिकेत असतात, याचाच फायदा रिलायन्स-जिओ सारखे नेहमीच घेत असतात. त्यात जिल्ह्यातील सत्ताधारी, पुढारी पुचाट निघाल्याने ‘कोणीही या आणि टिचकी मारुन जा’, अशी अवस्था सातारकरांची झाली आहे.