maharashtra

जिल्हा प्रशासनाला विजय दिवसाचा विसर

ऍड. विनित पाटील : वर्धापन दिन साजरा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

District administration forgets Victory Day
देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 साली पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धाला 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. असे असताना संपूर्ण देशभरात सुमारे 15 दिवसांपासूनच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून विजय दिवस साजरा करुन वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देवून गौरविण्यात येत आहे. मात्र सातारा प्रशासनाकडून असे घडताना दिसत नसल्यामुळे 16 डिसेंबर पूर्वी सैनिकांचा सन्मान न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक ऍड. विनित पाटील यांनी दिला आहे.

सातारा : संपूर्ण देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 साली पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धाला 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. असे असताना संपूर्ण देशभरात सुमारे 15 दिवसांपासूनच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून विजय दिवस साजरा करुन वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देवून गौरविण्यात येत आहे. मात्र सातारा प्रशासनाकडून असे घडताना दिसत नसल्यामुळे 16 डिसेंबर पूर्वी सैनिकांचा सन्मान न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक ऍड. विनित पाटील यांनी दिला आहे.
3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 दरम्यान इंडो-पाकिस्तान युद्ध झाले होते. या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी प्राणांची बाजी लावून अवघ्या 13 दिवसांतच पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावून बांग्लादेश या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. परंतू या युद्धामध्ये भारताचे सुमारे 3 हजारांपेक्षा जास्त जवान शहीद झाले होते, तर 12 हजार सैनिक जखमी झाले होते. 16 डिसेंबर रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. त्याप्रित्यर्थ देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा प्रशासनाच्यावतीने गौरव व सन्मान करण्यात येतो. 16 डिसेंबर 2021 रोजी इंडो-पाक युद्धाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानुसार या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मान करणे संयुक्तिक असतानाही जिल्हा प्रशासनाचे तसे केले नाही. याबाबत 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना भेटून तोंडी विनंती करुनही प्रशासनाच्यावतीने यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. एकूणच जिल्हा प्रशासनाकडून माजी सैनिकांबाबत सहानुभूती दिसून येत नसल्याचा आरोपही ऍड. विनित पाटील यांनी केलेला आहे.
इंडो-पाक युद्धाबरोबरच इतर युद्धामध्ये ज्या सैनिकांना वीरगती प्राप्त झाली, अशा सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देवून गौरविण्यात येते. परंतू सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असूनही आज सातारा जिल्ह्यामध्ये वीरगती प्राप्त झालेले तसेच माजी सैनिकांचाही सन्मान होत नाही, हे सातार्‍यासारख्या सैनिकी परंपरा लाभलेल्या जिल्ह्याला भूषणावह गोष्ट नाही. या सैनिकांचा 16 डिसेंबर पूर्वी यथोचित सन्मान न झाल्यास 16 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रध्वज स्तंभाच्या खाली एकदिवसीय आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही माजी सैनिक ऍड. विनित पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.