आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प होणार फलटणमध्ये
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश
उसाचा रस आणि बोयोसिरपवर आधारित आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारत असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडने केली आहे. प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात प्रति दिन 500 व दुसर्या टप्प्यात 1100 किलो लिटरपर्यंत वाढवली जाणार असून, यासाठी आवश्यक मान्यता मिळाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांचे यश मानण्यात येत आहे.
सातारा : उसाचा रस आणि बोयोसिरपवर आधारित आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारत असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडने केली आहे. प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात प्रति दिन 500 व दुसर्या टप्प्यात 1100 किलो लिटरपर्यंत वाढवली जाणार असून, यासाठी आवश्यक मान्यता मिळाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांचे यश मानण्यात येत आहे.
‘स्वराज’ने प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत तंत्रज्ञान भागीदार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 2010मध्ये स्थापन झालेल्या स्वराजला भारतातील सर्वात प्रगतीशील साखर कारखानदार आणि इथेनॉल उत्पादकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. स्वराजने आधीच प्रति दिन 60 किलो लिटर क्षमतेचा मोलसिस आधारित इथेनॉल प्रकल्प उभारला आहे. प्राजच्या तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प देशाच्या इथेनॉल प्रकल्पांमध्ये सर्वांत कमी पाण्याचा वापर करणारा म्हणून ओळखला जातो. स्वराज आणि प्राज यांचा विस्तारित प्रकल्प2023 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. प्राजकडे प्रकल्प आराखडा, अभियांत्रिकी, पुरवठा आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी जबाबदारी असेल. उसाचा रस आणि बोयोसिरप या इथेनॉलनिर्मितीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पांमध्ये केला जाईल. प्राजच्या उसाच्या रसावर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर बोयोसिरपमध्ये करण्याच्या अभिनव तंत्रज्ञानामुळे स्वराजला वर्षभर इथेनॉल उत्पादन सुरू ठेवण्यास मदत होईल.
या करारावर स्वाक्षरी करताना, स्वराजचे संस्थापक आणि प्रवर्तक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, भारत सरकारने आखलेल्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाशी या प्रकल्पाच्या आधारे जोडले जात असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्ही प्राजच्या कौशल्य व बांधिलकीची प्रशंसा करतो. हा प्रकल्प सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी समुदायाला रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल.
प्राजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, ‘आम्ही स्वराजला एक तंत्रज्ञान जाणकार ग्राहक म्हणून ओळखतो. प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्यासाठी ते नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास तयार असतात. हा प्रकल्प भारत सरकारच्या मिश्रणाच्या धोरणाची पूर्तता करण्याच्या दिशेने पडलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


