maharashtra

बिनपुराव्याचे आरोप करायचे रिकामे उद्योग बंद करा

खासदार उदयनराजे भोसले यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना जोरदार प्रत्युत्तर

जमिनीवर पाय असणारी आमची नगरसेवक पदापासून सुरू झालेली कारकीर्द आणि आपल्याला मिळालेली थेट आमदारकी हाच आपल्यामधील मूलभूत फरक आहे हे आम्ही बोलून दाखवले होते. केलेले आव्हान स्वीकारण्याऐवजी पालायन करायचे आणि पुन्हा बिनपुराव्याचे आरोप करायचे आणि आपलीच पाठ थोपटून घ्यायची असले बिन कामाचा उद्योग बंद करा.

सातारा : जमिनीवर पाय असणारी आमची नगरसेवक पदापासून सुरू झालेली कारकीर्द आणि आपल्याला मिळालेली थेट आमदारकी हाच आपल्यामधील मूलभूत फरक आहे हे आम्ही बोलून दाखवले होते. केलेले आव्हान स्वीकारण्याऐवजी पालायन करायचे आणि पुन्हा बिनपुराव्याचे आरोप करायचे आणि आपलीच पाठ थोपटून घ्यायची असले बिन कामाचा उद्योग बंद करा. फापटपसारा करून बोललो म्हणजे फार आपण मोठे नेते आहोत असा गैरसमज कोणी करून घेऊ नये, अशा मार्मिक शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
साताऱ्यात सध्या खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये शब्द युद्ध सुरू आहे. सातारा पालिकेच्या निवडणुकीत सातारकर उदयनराजेंच्या आघाडीचा कडेलोट करणार, अशी सडकून टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. या टीकेला उदयनराजे भोसले यांनी पुन्हा जोरदार उत्तर दिले आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, आव्हान स्वीकारायचे नाही आणि फापटपसरा लावून बोलायचे आणि आपण फार मोठे नेते आहोत असे दाखवायचे हे बिन कामाचे उद्योग त्यांनी बंद करावेत. तुम्ही एकदम आमदार झाला आहात आमची सुरुवात नगरसेवक पदापासून झाली हा विरोधाभास आम्ही मुलाखतीत कथन केला. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले ते एसीबीच्या ट्रॅक मध्ये पकडले गेले. जे काही आहे त्यांचे ते अधिकारी भोगत आहेत आणि भोगणार आहेत. त्यांचे समर्थन आम्ही कधीच केले नव्हते आणि आजही करत नाही. त्या पकडल्या गेलेल्या व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचे फोनवरील संभाषणाचा रेकॉर्डिंग दाखवले आहे त्या संभाषणाचे आम्ही समर्थन करत नाही. त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहीजे या मताचे आजही आम्ही आहोत.
सातारा नगरपरिषदेची प्रशस्त इमारत असावी अशी आवश्यकता आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीला, वाटणार नाही हे आम्हाला पटतंय, पण सातारकरांच्या कार्यक्षम सेवांसाठी ते आवश्यक आहे. आज अ वर्ग नगरपरिषद आहे, शहराची लोकसंख्या सुमारे दोन लाखापर्यंत आहे. भविष्याचा विचार करता, तीन लाख लोकसंख्या असली तर महापालिकेचा दर्जा मिळतो. भविष्याचा विचार करुन, आम्ही प्रशासकीय इमारतीची उभारणी करीत आहोत. अधिकारी कर्मचारी यांना कार्यक्षमतेने काम करण्यासाठी, प्रशस्त कार्यालय आवश्यक असते याची कल्पना आपल्या सारख्या डबक्यातच समाधान मानणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तींना येणार नाही. सातारकरांसाठी ही इमारत आवश्यक असल्याने आम्ही ती मार्गी लावत आहोत त्यासाठी ७० कोटी नव्हे आणखी काही रक्कम लागली तरी त्याची तजवीज आम्ही करुन घेवू त्याची काळजी तुम्ही करु नका.
या इमारतीच्या जागेची सुमारे ४० गुंठे जागा, नगरपरिषदेच्या नावावर होण्यासाठी दानशुर बाबासाहेब कल्याणी यांचेकडून नाममात्र खरेदीपत्राव्दारे रितसर हस्तांतरीत करुन घेतली आहे. कोट्यावधींची जागा नाममात्र किंमतीमध्ये नगरपरिषदेच्या नावे करण्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. या ठिकाणावर आरक्षण बदलुन रितसर जागा खरेदी केली आहे. पूर्वी येथे ऑडिटोरियमचे आरक्षण होते. कै. भाऊसाहेब महाराजांनी कायम ठेवले होते असे तुम्ही सांगत आहात.
मग इतक्या फक्त भ्रष्टाचारच झाल्यामुळेच वर्षात त्यावेळी आरक्षण विकसीत केले गेले नाही. आता ऑडीटोरियम बांधण्यात मर्यादा आल्या आहेत. होम थिअटरचे माध्यमातुन सर्व कार्यक्रम बघीतले जातात. साताऱ्यातील आहेत ती थिएटर्स बंद पडत आहेत. तसेच डि.सी.सी बँकेचा भव्य ऑडिटोरियम आज त्या जागे लगत आहे त्यामुळे कालबाहय झालेल्या गोष्टींमध्ये दूरदर्शीपणाने बदल करुन त्याची अंमलबजावणी देखिल सातारकरांच्या हितासाठी केली तर त्यात रडवेलेपणा करण्याचे काही कारण नाही.
आम्ही एकवीसाव्या शतकातच आहोत आपल्या विद्यमान कायदयांमध्ये कडक शिक्षांची तरतुद शक्यतो दिसत नाही. याच पळवाटा शोधुन काही व्यक्ती खुले आमपणे भ्रष्टाचार व समाजघातक कृत्य करतात. म्हणूनच राजेशाही असती तर हत्तीच्या पायी दिले असते. सुळावर चढवले असते, कडेलोट केला असता असे आम्ही वेळोवेळी बोललो आहोत.
त्यामुळे हे सतरावे शतक नाही हे सिध्दच होत आहे. परंतु तुम्हाला ते समजले नाही. आमच्या हातात कोणती सत्तास्थाने राहीली तुमच्या समान कोणत्याही भ्रष्टाचा-यांचा मुलाहीजा ठेवणार नाही याची तुम्हास अनामिक भीती वाटत आहे. म्हणुनच हे सतराव्वे शतक नाही असे सांगत जरा कमी कडक शिक्षांची अपेक्षा करीत आहात.
घनकचरा व्यवस्थापन व इतर कोणत्याही लोकहिताच्या बाबतीत तुम्हाला लोकहिताचे पाउल उचलता आले नाही. बायोमायनिंगसह, घनकचरा व्यवस्थापनाव्दारे विविध उपक्रमांची सार्वजनिक आरोग्याच्या हिताकरीता आम्हीच सर्वप्रथम यशस्वी सुरुवात केली आहे. बायोमायनिंगचे काम रितसर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतानुसारच आहे. तसेच राजपथावरचा उजेड करंज्यात पडल्याचे तुम्हाला दिसले यावरुन तुमची खुजी वृत्तीच दिसत आहे.
आम्ही पूर्वी कुचकं बोलायचो असे तुम्ही म्हणतात. परंतु ते तसे नाही. तुम्हाला नेहमी कुचकंच ऐकायची सवय लागली आहे ही त्यामधील खरी मेख आहे.
घरकुल योजनेचे संबंधीत ठेकेदारास नियमानुसार रितसर पध्दतीने ठेका मिळाला आहे, ज्या लोकांना तुम्ही हाकलुन देशोधडीला लावणार होता त्यांना आता कायमस्वरुपी घरकुले मिळवून देवून त्यांना जगण्याची नवी दिशा देण्याचे काम आम्ही करीत आहोत. ग्रेडसेपरेटर मुळे आज पोवईनाक्यावर वाहतुकीचा खोळंबा होत नाही हे वास्तव आहे. ग्रेडसेपरेटर आपले काम नाही अशी तुम्ही कबुली दिली आहे. कबुली दिली नसती तरी लोकांना माहीती आहे की, ग्रेडसेपरेटरचे काम आम्हीच केले आहे. ग्रेडसेपरेटर म्हणजे काळाची गरज होती.
शहापूर योजना खर्चिक असताना राबविलीच का हा मुलभुत प्रश्न आहे. कण्हेर धरण प्रदेशिक योजना ग्रॅव्हीटीने सातारा शहर व आजुबाजुच्या १७ गावे, वाडया, वस्त्यांकरीता होती. शहापूर योजना अव्यावहारीक, खर्चिक पंपिंग असलेले योजना स्वतःच्या स्वार्थासाठी सातारकरांच्या माथी मारली. शहापूर योजना खर्चिक असेल तर आता बंद करा असे आज म्हणणे म्हणजे करुन करुन भागला आणि देवपूजेला लागला अश्या तुमच्या युज अँड थ्रो मनोवृत्तीचे प्रतिक आहे.
छोट्या, बारिक सारिक आरोपामुळे इतका राग यायचे कारण नाही असेही तुम्हीच त्याच पत्रपरिषदेमध्ये बोलता. याचाच अर्थ केवळ काहीतरी बोलायचे म्हणून तुम्ही आरोप करीत असल्याची स्वतःहून कबुलीच दिली आहे. म्हणूनच तुमच्या या वरपांगी भ्रष्ट बडबडीला सातारकरांच्या लेखी शुन्य किमत आहे.