maharashtra

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार

सातारा जिल्ह्यातील भाजप आमदारांची खळबळजनक भाकिते

Devendra Fadnavis will be the Chief Minister of Maharashtra
येत्या आषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठलाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जातील, असे भाकित सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात केले आहे.

सातारा : येत्या आषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठलाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जातील, असे भाकित सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात केले आहे. भाजपचे जिल्हयातील दुसरे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही भाजप सरकार राज्यात येणार असल्याचा दावा केल्याने जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
सातारा शहर परिसरातील वेदभवनं मंगल कार्यालय येथे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत 23 जून रोजी साताऱ्यात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेण्याचे नियोजन ठरले आहे. या मेळाव्याच्या नियोजन बैठकीनंतर प्रतिक्रीया देताना आमदार जयकुमार गोरे यांनी आगामी काळात मुख्यमंत्री पदाची सर्व सूत्रे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हाती येतील, असे धक्कादायक भाकीत केले.
महाराष्ट्रातील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आमदारांच्या एका मोठ्या तुकडी बरोबर राज्यातून गायब झाल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांनी केलेला दावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यंदा आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये विठ्ठलाची पूजा करणार आहेत.
आमदार जयकुमार गोरे यांची ही प्रतिक्रिया असताना साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही गोरे यांची री ओढली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी मुख्यमंत्री असतील, असे भाकीत प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत यावे यासाठीच हालचाली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार लवकरात लवकर यावे याची ही सुरुवात आहे. मध्यवर्ती निवडणुका लागतील का, या प्रश्नावर ते म्हणाले मध्यवर्ती निवडणुकांची सध्या तरी चर्चा नाही. पक्षाच्या बैठकीत कोणी सूतोवाच केलेले नाही. मात्र परिस्थिती अस्थिर आहे हे नक्की. पक्षाने सूचना केली तर आम्हीही मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार आहोत, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.