ख्रिश्चन समाजावर वाढते अन्याय सुरू झाल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या भितीपासून मुक्तता मिळावी या मागणीसाठी ख्रिश्चन एकता समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
सातारा : ख्रिश्चन समाजावर वाढते अन्याय सुरू झाल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या भितीपासून मुक्तता मिळावी या मागणीसाठी ख्रिश्चन एकता समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. या निवेदन प्रक्रियेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
एकता मंचचे अध्यक्ष जॉन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, संविधानाने दिलेले अधिकार कायद्याने दिलेले स्वातंत्र्य कल्याणकारी असणारे शासन असून देखील ख्रिश्चन समाजावर अन्याय वाढत आहेत. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. आम्हाला या सर्व प्रकारापासून मुक्तता मिळावी आणि भयमुक्त समाजाची निर्मिती व्हावी, अशी आमची मागणी आहे. आमच्या समाजाच्या वास्तू आणि मूर्ती यांची विटंबना होत आहे. त्या कृतींना आळा घालण्यात यावा.
ख्रिश्चन एकता मंचच्या या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भारतामध्ये सर्वधर्मसमभावाचे वातावरण आहे. कोणताही धर्म मुक्तपणे येथे त्यांच्या विचारांचा प्रसार करू शकतो. मात्र असे असताना ख्रिश्चन बांधवांना होणाऱ्या त्रासाची आम्हाला जाण आहे. संबंधित गोष्टी या बेकायदेशीर असून त्या विरोधात ठोस पावले उचलली गेली पाहिजेत आणि ख्रिश्चन बांधवांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्याकरिता वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा अशोक बापू गायकवाड यांनी दिला.


