जिंतीतील पित्याने मुलीच्या लग्नात केले लाख रुपयांच्या पुस्तकाचे कन्यादान
जयवंत तांबे गुरुजींच्या आगळ्या वेगळ्या कृतीचे परिसरातून कौतुक
तालुक्यातील जिंती गावातील तांबे परिवारातील विवाह समारंभावेळी जयवंत तांबे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून तब्बल एक लाख रुपयांची पुस्तके उपलब्ध करून देऊन आज समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिल्याने परिसरात हा कौतुकाचा कौतुकाचा विषय ठरला असून तांबे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
फलटण : तालुक्यातील जिंती गावातील तांबे परिवारातील विवाह समारंभावेळी जयवंत तांबे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून तब्बल एक लाख रुपयांची पुस्तके उपलब्ध करून देऊन आज समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिल्याने परिसरात हा कौतुकाचा कौतुकाचा विषय ठरला असून तांबे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
जिंती गावातील जयवंत तांबे यांची कन्या संजुश्री व रघुनाथ कोळपे यांचे चिरंजीव सचिन यांचा विवाह 7 डिसेंबर रोजी संपन्न झाला. दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे लग्नसराई बंद होती परंतु शासनाने लग्न समारंभसाठी काही नियम लागू करून लग्न समारंभ यंदा सुरू झाला आहे. खरं तर समाजात अनेक लग्न सोहळे होत असतात, अनेकदा आपण शाही लग्न सोहळे बघत असतो, आपल्या मुलींची हौस करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून मुलीची एन्ट्री करत असतात किंवा बुलेट गाडी आंदण म्हणून मुलींना देत असतात.
परंतु तांबे गुरुजी यांच्या पत्नी स्वर्गीय सविता जयवंत तांबे या आपल्या मुलीसाठी पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून द्यावा अशी इच्छा आपल्या पती समोर वारंवार करत असल्याने तांबे यांनी मुलीच्या कन्या दानासाठी पुणे येथून एक लाख रुपये किंमतीची पुस्तके उपलब्ध करून दिली. खरे तर यामुळे मोबाईल आणि इंटरनेट मध्ये गुरफटलेल्या आजच्या पिढीला पुस्तकांच्या वाचनाची आवड लागावी. तसेच नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, डॉ, बाबासाहेब आंबेडकर व संत साहित्याची ओळख होणार आहे. त्यांच्या या कृतीतून लेक वाचवा, लेक शिकवा हा संदेश दिला गेला असून तांबे परिवाराने लग्न पत्रिकेतून स्वच्छतेचा व शिक्षणाचा संदेश देत खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाचा उपक्रम लग्नाच्या निमित्ताने राबवत समाजाला विवाह असा देखील होवू असा आदर्श घालून दिला आहे.
कन्यादानात दिली बौध्दिक संपत्ती
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, प्रियदर्शनी इंदिरा गांधी, आनंदीबाई जोशी या महापुरुषांची चरित्रे, तसेच गंगेत गगन वितळले, बहिष्कृत भारत, कथा-कादंबरी (मृत्यूंजय, राधेय), अनमोल वारसा खंड 1 व 2, स्पर्धा परीक्षा पुस्तके, आत्मचरित्र पुस्तके (कृष्णाकाठ), माझे सत्याचे प्रयोग, असामी-असामी, प्रकाश वाटा, अशा प्रकारे पुस्तके कन्यादानात देण्यात आले.


