झाडे ही निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली देणगी आहे. म्हणूनच निसर्गातील सर्व झाडांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य समजायला हवे. असे मत रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
पुसेगाव : झाडे ही निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली देणगी आहे. म्हणूनच निसर्गातील सर्व झाडांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य समजायला हवे. असे मत रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात "आजादी का अमृत महोत्सव व माझी वसुंधरा" अभियाना अंतर्गत जनजागृती व स्वच्छता सप्ताह समारोप कार्यक्रम प्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. आपल्या प्रमुख भाषणात डॉ. क्षीरसागर पुढे म्हणाले, 'झाडे ही मनुष्य साठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्याच बरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडेच महत्वाची भूमिका बजावतात. परंतु आज आपल्या अनेक शोधाच्या अभिलाषा मुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा वेळी पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. निसर्गा मुळेच मनुष्याला अन्न, वस्त्र, निवारा, औषध,इ. मूलभूत गरजांची पूर्तता होते. त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण जनजागृती व स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. व पर्यावरण संवर्धनाच्या संबंधीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे म्हणाले, "महानगरातील वाढत्या लोकसंख्या मुळे नैसर्गिक घटकावर पर्यावरणात्मक दृष्ट्या परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण आज देशांत वाढत्या औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. म्हणूनच पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताह आयोजित केला जात आहे. या कालावधीत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी मंदिर परिसर, स्मशानभूमी परिसर, बाजार पेठ, एस.टी .स्टँड परिसर इत्यादी ठिकाणची स्वच्छता केली. एक आदर्श नागरिक म्हणून आपल्या गावातील स्वच्छता, पर्यावरण जनजागृती करणं हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जबाबदारी असते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव प्रा. अरुण कट्टे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. अरुण कट्टे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. सुधीर धोंगडे यांनी केले. आभार प्रा. डॉ. अनिल जगताप यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


