maharashtra

सातारा पालिकेच्या घंटागाड्या निघाल्या भंगारात

पुरेशा देखभाल दुरुस्ती अभावी पालिकेचा तोटा

Satara Municipal Corporation's bell carts were scrapped
अवघ्या चार वर्षांपूर्वी सातारा पालिकेने खरेदी केलेल्या घंटागाड्या पुरेशा देखभालीअभावी भंगारमध्ये निघू लागल्या आहेत. पालिकेच्या हुतात्मा उद्यान येथे या गाड्या अतिशय नादुरुस्त अवस्थेत उभ्या असून काही घंटागाड्यांच्या बॅटर्‍या चोरीला गेल्याने या गाड्या म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

सातारा : अवघ्या चार वर्षांपूर्वी सातारा पालिकेने खरेदी केलेल्या घंटागाड्या पुरेशा देखभालीअभावी भंगारमध्ये निघू लागल्या आहेत. पालिकेच्या हुतात्मा उद्यान येथे या गाड्या अतिशय नादुरुस्त अवस्थेत उभ्या असून काही घंटागाड्यांच्या बॅटर्‍या चोरीला गेल्याने या गाड्या म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
सातारा पालिकेने स्वच्छ सातारा सुंदर सातारा ही घोषणा देत चार वर्षांपूर्वी तब्बल 40 घंटागाड्या साडेतीन कोटी रुपयात खरेदी केल्या होत्या. तत्कालीन आरोग्य सभापती विशाल जाधव यांच्या कार्यकाळात ही खरेदी करण्यात आली होती. पालिकेने सातारा शहराच्या स्वच्छतेची मक्तेदारी भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीकडे दिली होती. अटी शर्तीनुसार पालिकेने ठेकेदाराला गाड्यांची देखभाल दुरुस्ती करावयाची, असे बंधनकारक केलेले असताना जवळपास दहा ते बारा गाड्या पालिकेच्या हुतात्मा उद्यानामध्ये अतिशय जीर्ण अवस्थेत उभ्या आहेत. काही घंटागाड्यांचे हौदे आणि त्याचे पत्रे गंजले असून त्यातून कचरा सातत्याने सांडत असतो. महाबळेश्वर पालिकेच्या घंटागाड्या या कायझेन पद्धतीच्या असून त्यांची मागील बाजू ही संपूर्णपणे आच्छादलेली असते.
सातार्‍यात मात्र घंटागाड्यांवर कचरा घेताना हा कचरा झाकला जात नाही. त्यामुळे सोनगाव डेपो पर्यंत हा कचरा जाईपर्यंत निम्मा झालेला असतो. भाग्य दीप वेस्ट मॅनेजमेंटच्या सूत्रांनी गाड्यांची दुरुस्ती योग्य पद्धतीने न केल्याने पालिकेला या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा बोजा पडण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकात परिवहन विभागाच्या देखभाल दुरुस्तीसाठी केवळ सात लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र गाड्यांची अवस्था पाहता येणारा खर्च त्याच्या तिप्पटही असू शकतो. सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे अजूनही 15 ज्यादा गाड्यांची आवश्यकता आहे. आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक यांचा वस्तुस्थितीपूर्ण अहवाल मुख्याधिकार्‍यांना पुढे ठेवत नसल्याचा आरोप होत आहे. भाग्यदीप आणि पालिका प्रशासन यांच्यात छुपे साटेलोटे असल्याची चर्चा असून त्यामध्ये बरेच मुरब्बी राजकारणी रमलेले आहेत. यामुळे घंटागाड्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष कोण देणार, हा प्रश्न सजग नागरिक मंचाने एका पत्राद्वारे उपस्थित केला आहे. मात्र या पत्राला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याची चर्चा आहे.