पोस्ट ऑफिस मधून होणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी
जिल्ह्यातील दीडशे शेतकऱ्यांनी केली नोंदणी; सातारा मंडल प्रवर अधीक्षक व्यंकटेश्वर रेड्डी यांची माहिती
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या योजनेची नोंदणी जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस मधून करता येणार आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील दीडशे शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केल्याची माहिती सातारा मंडल टपाल विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक व्यंकटेश्वर रेड्डी यांनी दिली.
सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या योजनेची नोंदणी जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस मधून करता येणार आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील दीडशे शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केल्याची माहिती सातारा मंडल टपाल विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक व्यंकटेश्वर रेड्डी यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी बँक पासबुक, सातबारा, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. सातारा डाक विभाग जिल्ह्यातील सर्व जनतेला विविध शासकीय योजना घरपोच देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सातारा विभागीय कार्यक्षेत्रात 384 पोस्ट ऑफिस असून ही सुविधा शासकीय माफक दरामध्ये उपलब्ध आहे. याबरोबरच पोस्ट ऑफिस मध्ये सीएसटी प्लॅटफॉर्म मधून सर्वप्रकारची बिल पेमेंट, गॅस बुकिंग, विमान- रेल्वे- बस तिकीट आरक्षण, पॅन कार्ड आवेदन, विमा पॉलिसी यासारख्या लागणाऱ्या सविधासुद्धा टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी करताना शेतकरी बांधवांनी आपला पिक विमा काढून घ्यावा. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळू शकेल. यासाठी सातारा विभागातील सर्व टपाल कार्यालयात प्रधानमंत्री पिक विमा योजना नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या हंगामातील पिक विमा नोंदणीची शेवटची तारीख 31 जुलै असल्याने त्या अगोदरच नोंदणी करून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे रेड्डी यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारी जमीन आणि पीक यांची परिस्थिती पाहून त्या-त्या पिकानुसार आणि जमिनीच्या कार्य क्षेत्रानुसार संबंधित शेतकऱ्यांना विमा योजनेची रक्कम निश्चित केली जाईल, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापक संतोष कुमार सिंग यांनी दुसऱ्या योजनेची माहिती देताना सांगितले की, टाटा एआयजी व इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्या संयुक्त सहकार्याने दहा लाख रुपयांचा अपघात विमा केवळ प्रतिवर्ष 399 रुपयात करता येणे शक्य आहे. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व किंवा आवश्यक असल्यास दहा लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे. सदर पॉलिसी काढण्यासाठी गावातील पोस्टमनशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. या विमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू 10,000,00, कायमचे अपंगत्व 10,000,00, दवाखान्याचा खर्च 7000, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च एक लाख रुपये प्रति मुल, ऍडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपये, ओपीडी खर्च तीस हजार रुपये, अपघाताने अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये, कुटुंबाला दवाखाना प्रवास कर्ज 25000 अशा या योजनेच्या अटी असून या योजनेला वेटिंग पिरीयड नाही .
18 ते 65 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला वार्षिक एक हप्ता भरून अशी योजना सुरू करता येणार आहे. सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवर घसरून पडणे, पाण्यात पडणे, गाडीवरील अपघात असे अपघात या योजनेमध्ये लागू होतात. इच्छुकांनी जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संतोष कुमार सिंग यांनी केले.
दरम्यान, आत्महत्या, मादक पदार्थां मुळे उद्भवलेला अपघात, साहसी खेळाडूंमधील सहभाग, लष्कर, नौदल, हवाईदल, पोलीस दल, तसेच आरोग्य संदर्भातील कोणतीही वैद्यकीय परिस्थितीत उपचार करणारे डॉक्टर- त्यांचे कुटुंबीय, डास चावणे, प्रत्यक्ष केलेल्या किंवा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात सहभाग, दंगल, गुन्हा, गैरवर्तन, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसताना रुग्णालयात घेतलेला उपचार, कोणत्याही ड्रायव्हिंग व्यवसायाशी असणारी संबंधित व्यक्ती, कोणत्याही प्रकारच्या खाणकामाशी संबंधित कामगार व बांधकाम मजूर इत्यादींना ही विमा योजना लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


