maharashtra

रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून ‘पवार शिक्षण संस्था’ करा

उदयनराजेंची खोचक शब्दांत शरद पवार यांच्यावर टीका

रयत शिक्षण संस्थेतील कारभारावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून ‘पवार शिक्षण संस्था करा,’ अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा यावरती बोललं पाहिजे, असा सल्ला उदयनराजे भोसलेंनी दिला आहे.

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील कारभारावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून ‘पवार शिक्षण संस्था करा,’ अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा यावरती बोललं पाहिजे, असा सल्ला उदयनराजे भोसलेंनी दिला आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचार्‍यांची आज (३ सप्टेंबर) आंदोलन केलं. त्या अनुषंगाने उदयनराजे भोसले यांना प्रसारमाध्यमांनी सवाल केला. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असला पाहिजे, असा कायदा आहे. पण, असे काय घडलं की, या कायद्यात बदल करण्यात आला. काही लोकांना सवयच लागली आहे, तुझं ते माझं आणि माझं ते ही माझं आणि जे दिसतंय ते पण माझं. या पद्धतीने संस्था आपल्या ताब्यात घेतली. आम्ही संस्थेसाठी दिलं आहे, यांनी काय दिलं. यांचं योगदान काय हे तरी एकदा कळू द्या, असा प्रश्नही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
रयत म्हणजे सर्वसामन्यांची संस्था
राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. आण्णा (कर्मवीर भाऊराव पाटील) आणि आज्जी (राजमाता सुमित्राराजे भोसले) हे नेहमी समाजसेवेसाठी कार्यरत होते. आज या संस्थेचा पुर्वीचा हेतू राहिला नाही. ज्यांचे योगदान नाही, त्यांना तुम्ही संस्थेत घेत आहात. रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले.
आण्णांच्या कुटुंबातील व्यक्तींनी यावरती बोललं पाहिजे
रयतचं नाव बदलून टाका. ज्या कुटुंबाची संख्या जास्त आहे, त्यांचे नाव द्या. पवार कुटुंबियांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रयतचे नाव ‘पवार शिक्षण संस्था’ करा. जे लोक आंदोलनाला बसले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, ते तरी विचारात घ्या. कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा यावरती बोललं पाहिजे, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.