maharashtra

‘अजिंक्यतारा' राज्य संरक्षित किल्ला घोषित करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यासोबत बैठक

राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची माहिती

Meeting with Chief Minister soon to declare Ajinkyatara a state protected fort
सातारा शहराजवळ असलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याला पुरातन इतिहास आहे, परंतु काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे व त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही, तरी हा किल्ला राज्यसंरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा

सातारा : सातारा शहराजवळ असलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याला पुरातन इतिहास आहे, परंतु काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे व त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही, तरी हा किल्ला राज्यसंरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा यासाठी लवकरच सांस्कृतिक, महसूल, वनविभाग, नगरविकास विभागाची संयुक्त बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत घेऊन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी दिली. याबाबत शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री.छ.वृषालीराजे भोसले यांनी पुढाकार घेत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  
सातारा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली नगरी मराठयांची चौथी राजधानी असलेल्या अंजिक्यतारा किल्ला शिलाहार वंशीय भोज राजा (दुसरा) याने इ.स. 1190 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चाँदबिबि या किल्यावर कैदेत होत्या. स्वराज्याचा विस्तार होत असताना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला श्री.छ. शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली होती. श्री.छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इ.स. 1700 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला. परंतु लवकरच मोगलांनी त्याचा ताबा घेतला. शाहू महाराज मोगलांच्या सुटकेतून सातारला आल्यानंतर 1708 मध्ये अंजिक्यतारा आपल्या ताब्यात घेतला. दुस-या शाहूंच्या निधनानंतर हा किल्ला 11 फेब्रुवारी 1818 मध्ये इंग्रजांकडे गेला. श्री.छ. शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे व त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही. तरी हा किल्ला राज्यसंरक्षित स्मारक किल्ला म्हणून जाहीर करण्याबाबत कार्यवाही करावी त्याकरिता लागणारे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, अशा प्रकारचे निवेदन शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले यांनी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांना दिले होते. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने या प्रश्नाची माहिती घेतली. त्याप्रमाणे याप्रश्नी सांस्कृतिक, महसूल, वनविभाग, नगरविकास विभागांचे मंत्री महोदय, विभागप्रमुख आणि संबंधित प्रमुख अधिका-यांची संयुक्त बैठक लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत घेऊन हा प्रश्न तातडीने निकाली काढणार असल्याची माहिती त्यांनी शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री.छ.वृषालीराजे भोसले यांना दूरध्वनीव्दारे दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.