maharashtra

अटल सेतू, समृद्धीवर फास्टॅगचा वार्षिक पास चालणार नाही, पण राज्यातील 'या' जिल्ह्यांना होणार फायदा


Atal Setu, FASTag annual pass will not work on Samruddhi, but 'these' districts of the state will benefit
Fastag Annual Pass In Maharashtra: कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगरव्यावसायिक वाहनांसाठी 3 हजार रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली

Fastag Annual Pass In Maharashtra: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच वार्षिक फास्टॅगच्या योजनेची घोषणा केली होती. काप, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी 3 हजार रुपयांत फास्टॅगचा वार्षिक पास देण्यात येणार आहे. या पासमुळं तुम्ही वर्षभरात टोलनाक्यावरुन प्रवास करू शकता. राष्ट्रीय महामार्गावर वर्षाला 200 वेळा तुम्हाला जाता येणार आहे. पण हा फास्टॅगआधारित पास फक्त राष्ट्रीय महामार्गासाठीच वैध असणार आहे. राज्य महामार्गावर प्रवास करताना तुम्हाला या पासने प्रवास करता येणार नाही. महाराष्ट्रातदेखील कोणत्या कोणत्या महामार्गांवर तुम्हाला फास्टॅगच्या या पासचा वापर करता येणार हे जाणून घेऊयात. 

महाराष्ट्रातील महत्त्वकांक्षी महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू महामार्ग या दोन्ही मार्गावर फास्टॅगच्या वार्षिक पास लागू नसणार. म्हणजे येथे वाहनधारकांना टोल द्यावाच लागणार आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर देखील हा पास लागू होणार नाही. मात्र मुंबई-पुणे जुना महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळं या महामार्गावरुन प्रवास केल्यानंतर तुम्हाला टोल पास वापरता येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणखी कोणत्या महामार्गावर या पास वापरता येणार आहे. 

फास्टॅगच्या वार्षिक पासचा फायदा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वाहनचालकांना होणार आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील राज्यातील सर्वाधिक 10 टोलनाके असून, सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर 9 टोलनाके आहेत. हेच नागपूरमध्ये 6, धाराशिवमध्ये 6, धुळे 5, बीड 4, जळगाव 4, बुलढाणा 3 अशी आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्वांत कमी टोलनाके हे सांगली, पालघर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, हिंगोली आणि अकोला जिल्ह्यांत आहेत. येथे प्रत्येकी एक टोलनाका आहे. 

फास्टॅग कधीपासून सुरू होणार?

15 ऑगस्टपासून हा पास सुरू होईल. याची मुदत 1 वर्ष किंवा 200 खेपा यांपैकी जे आधी पूर्ण होईल, तेवढी असेल. या पासमुळे राष्ट्रीय महामार्गावर केवळ 15 रुपये एवढाच टोलखर्च सामान्यांना येईल. राजमार्ग यात्रा मोबाइल अॅप आणि एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही हा पास खरेदी करू शकणार आहात. पास सक्रिय करताना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस येईल. वर्ष संपण्याआधी २०० टोल झाल्यानंतर पुन्हा 200 टोलसाठी किंवा वर्षभरासाठी पास खरेदी करू शकता.