maharashtra

शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली तरच राष्ट्र प्रगत बनते : आ. पृथ्वीराज चव्हाण


Only by investing in education and health can a nation become advanced : Prithviraj Chavan
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराड : आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील वेणूताई चव्हाण सभागृहात रविवारी ६ रोजी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. भगवान शामराव खोत यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त केंद्रातील अधिकाऱ्यांच्या वतीने "सोहळा कृतज्ञतेचा" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये प्रा. भगवान खोत व त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती विद्या खोत यांचा सत्कार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्रो. डॉ.बी.एन. गोफणे, अॅड. संभाजीराव मोहिते, नायब तहसीलदार बी.एम. गायकवाड, बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांच्यासह शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, आपल्याकडे आज नॉलेज बेस्ड म्हणजे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था बनवणे आवश्यक आहे. तरच आपला विकास होऊ शकतो. आज देशाची अर्थव्यवस्था नाजुक बनली असून आपण प्रगत राष्ट्रांच्या खूप मागे चाललो आहोत. आपला विकासाचा निर्देशांक मायनसमध्ये आला आहे. शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था ठिक नाही. त्यामुळे शिक्षण व आरोग्य व्यवस्थेकडे आपणास लक्ष द्यावे लागेल, तरच प्रगती होऊ शकेल, असे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, प्रा. भगवानराव खोत यांचे गाव वाळवा तालुक्यातील कामेरी. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा, कडेपूर व कराड येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करत त्यांनी नोकरीतील सर्व जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे पार पाडल्या आहेत. आपल्या विषयावर राज्याच्या, देशाच्या सद्य परिस्थितीवर व स्पर्धा परीक्षेबाबत व्याख्याने दिलेली आहेत. कराडकरांना जे काम लक्षात राहील, ते म्हणजे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय संलग्न स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जवळजवळ २२ वर्षे चालवणे. आज या केंद्रातून शेकडो विद्यार्थी यु.पी.एस.सी व एम.पी.एस.सी मध्ये यशस्वी होऊन देश व राज्याच्या प्रशासनातील महत्वाच्या जागेवर अधिकार पदावर राहून त्यांनी विविध विभागांमध्ये आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटवला आहे. खोत सरांनी केलेले हे कार्या खरच कौतुकास्पदच आहे. आज सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता दर्शवत "सोहळा कृतज्ञतेचा" कार्यक्रम घेऊन प्रा. खोत सरांचा माझ्या हस्ते सत्कार केला, याबद्दल समस्थ अधिकाऱ्यांचे आ. चव्हाण यांनी  यावेळी कौतुक केले. तसेच त्यांच्या यशाचे व त्यांच्या कार्याबद्धल त्यांचे अभिनंदनही केले.  
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी प्रा. खोत हे बापूजींच्या विचारांचे खरेखुरे पाईक आहेत. त्यांनी अखंडपणे आपले मार्गदर्शनाचे कार्य सुरू ठेवावे, असे मत व्यक्त केले. तर प्रमूख उपस्थित प्रो.डॉ. बी.एन. गोफणे यांनी खोत सरांचा स्वभाव, त्यांनी घेतलेले श्रम, विद्यार्थ्यांसाठी त्यांची तळमळ, आपल्या कार्यावरील श्रद्धा आदीविषयी मार्मिक शब्दांत मनोगत व्यक्त केले.
अॅड. संभाजीराव मोहिते यांनी खोत सरांचे कराडच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व विजय दिवस समारोह समितीमधील योगदान किती मोठे आहे, ते स्पष्ट केले. नायब तहसीलदार बी.एम. गायकवाड यांनी सरांची चिकाटी, विद्यार्थ्यांविषयी असणारी तळमळ याविषयी मत मांडले. तसेच शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांनी खोत सरांविषयी ह्रदयाला स्पर्श करणारे अत्यंत भावस्पर्शी भाषण केले.
सत्कारमूर्ती प्रा. भगवान खोत सत्काराला उत्तर देताना सद्गुरू गाडगे महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना अभिवादन करुन म्हणाले, आयुष्यामध्ये खूप काम करता आले. बापूजीचें विचार समाजात रुजवता आले, याचा मनस्वी आनंद वाटतो. स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही दिलेले थोडेफार ज्ञान आपण घेतले व उज्वल यश संपादन केले. राज्याच्या व देशाच्या प्रशासनातील महत्वाच्या  अधिकार पदावर राहून आपण सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून  जनतेसाठी विकासाभिमुख काम करीत आहात. यासाठी मी आपला सदैव कृतज्ञच राहीन, असे मत व्यक्त केले. तसेच प्रा. खोत यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यास मनस्वी शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, राज्य कर  उपाआयुक्त गणेश पाटील, डी.वाय.एस.पी सागर कवडे, प्राचार्य योगेश गुरव, एल.आय.सी.डी.ओ.  सचिन पाटील, डी.वाय.एस.पी संकेत गोसावी, नायब तहसीलदार श्रीधर राजमाने, गुप्त वार्ता अधिकारी मकरंद येडगे, तहसीलदार अजित पाटील, नवोदयचे सुर्यकांत काळे, शर्मिला पाटील, कामगार उपायुक्त शितल कुलकर्णी या  अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात खोत सरांनी आम्ही अधिकारी बनण्यासाठी घेतलेले श्रम आम्ही कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच आम्ही हा ‘सोहळा कृतज्ञतेचा’ कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. तसेच सरांची विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी, विद्यार्थ्यांना मदत करण्याची वृत्ती याविषयीही त्यांनी अतिशय भावूक होऊन आपापली मते व्यक्त केली. कु. ऐश्वर्या पाटणकर हिने एक कविता सादर करून सरांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उद्योजक राजविक्रम जाधव यांनी केले. कंपोझर शिंगर मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधील वैभव पोतदार यांनी  स्वरबद्ध स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन भरत कदम यांनी केले. आभार कामगार उपायुक्त शितल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कु. सिमरन भादुले हिने सादर केलेल्या वंदेमातरम या राष्ट्रगीताने झाली.