maharashtra

अतिवृष्टीत बेघर झालेल्या मागासवर्गीय कुटूंबाला घरकुल मंजूर

रमेश उबाळे यांच्या पाठपुराव्याला यश, घरकुलाचे काम तातडीने सुरू होणार

Household sanctioned to backward class families who became homeless due to heavy rains
तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील समीर बाबूराव उबाळे या मागासवर्गीय कुटूंबाचे घर पडून हे कुटूंब पूर्णतः बेघर होऊन रस्त्यावर आले.

पुसेगाव : तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील समीर बाबूराव उबाळे या मागासवर्गीय कुटूंबाचे घर पडून हे कुटूंब पूर्णतः बेघर होऊन रस्त्यावर आले. दरम्यान प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन निवेदन देऊन या निवेदनाची प्रत गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यानंतर गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी ही बाब गांभीर्याने घेत केवळ चारच दिवसामध्ये रमाई योजनेतुन समीर उबाळे पिडीत कुटुंबाला घरकुल मंजूर केले आहे.
याबाबतचे घरकुल मंजुरीचे पत्रही कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी बोराटे यांनी रमेश उबाळे यांना नुकतेच दिले असल्याने या घरकूलाचे बांधकाम तातडीने सुरू होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुमारे तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे गावात राहणाऱ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये राहत असलेल्या समीर बाबुराव उबाळे यांच्या घराची भिंत मध्यरात्री कोसळली. परंतु सुदैवाने या घरात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. परंतु कौटूंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने हे कुटूंब पूर्णतः बेघर झाले. या पडलेल्या घराचा पंचनामा ल्हासुर्णे गावच्या तलाठी व ग्रामसेवकानी केला होता परंतु प्रत्यक्षात घरकुल मंजूर झाले नाही अखेर या प्रकरणी रमेश उबाळे यांनी लक्ष घालून या पीडित कुटूंबाला तातडीने घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून कोरेगाव पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर केला. परंतु पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या पीडित कुटुंबाला कोणतीही मदत केली नसून घरकुल मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका उदासीन दिसून आल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने कोरेगाव पंचायत समितीतील प्रशासन हादरून गेले होते.
दरम्यान रमेश उबाळे यांनी  सन २०१९ ते २०२२ या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुल योजनेची माहिती घेतली असता शासकीय योजनेअंतर्गत तब्बल २१३ घरकुल मंजूर झाल्याचे निदर्शनास आले आहे. तथापी या मंजूर झालेल्या घरकुलाच्या अनुक्रमात समीर बाबुराव उबाळे यांचे नाव १६ व्या अनुक्रमांकावर असूनही या पीडित कुटुंबाला घरकूल योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत प्रशासन उदासिन का आहे? याची चौकशी व्हावी, अशी मागणीही रमेश उबाळे यांनी केली होती. अखेर रमेश उबाळे यांच्या निवेदनाची दखल घेत पीडित कुटूंब राकेश उबाळे यांना गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी केवळ चारच दिवसात घरकुल मंजूर केले आहे.

     
रमेश उबाळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे मानले आभार
जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाची प्रत रमेश उबाळे यांनी कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सादर करत गेल्या तीन वर्षांत २१३ घरकुल आपणच मंजूर केली आहेत, याबाबत इतंभुत माहिती व पुरावे देऊन प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर त्यांनी संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्याला बोलविले.
कर्मचाऱ्याने गेली तीन वर्षे रमाईसाठी आधीकचे अनुदान आले नसल्याचे नमूद केले. परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत आपण लवकरात लवकर या पीडित कुटूंबाला घरकुल योजनेचा लाभ देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार उबाळे याना गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळत केवळ चारच दिवसांमध्ये घरकुल मंजूर केल्याने रमेश उबाळे यांनी बोराटे यांचे अभिनंदन करून आभारही मानले.

मागासवर्गीय लोकांनी संपर्क साधण्याचे आवाहन  
मागासवर्गीय लोकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्यावर कुणी अन्याय केल्यास आपण या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणार आहे. मागासवर्गीय नागरिकांना आपणावर अन्याय होत आहे असे वाटल्यास आशा मागासवर्गीय नागरिकांनी आपणाशी संपर्क साधावा, असे आवाहनही रमेश उबाळे यांनी केले आहे.