maharashtra

राज्यातील महाविकास आघाडी अभेद्यच राहणार

इंडिया अगेन्स्ट करप्शन चे अध्यक्ष हेमंत पाटील यांचा भाजपला टोला

The Mahavikas Aghadi in the state will remain impenetrable
महाराष्ट्रातील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सरकार सत्तेचा पाच वर्षाचा कार्यकाल नक्की पूर्ण करणार. भाजपने कितीही राजकीय खेळ्या केल्या तरी महाविकास आघाडी अभेद्यच राहणार असून त्यांची सत्ता जाणार नाही, अशी ठाम ग्वाही इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

सातारा : महाराष्ट्रातील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सरकार सत्तेचा पाच वर्षाचा कार्यकाल नक्की पूर्ण करणार. भाजपने कितीही राजकीय खेळ्या केल्या तरी महाविकास आघाडी अभेद्यच राहणार असून त्यांची सत्ता जाणार नाही, अशी ठाम ग्वाही इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली. भाजपच्या साम-दाम-दंड-भेद याची कोणतीही कूटनीती येथे चालणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पाटील यांनी करोना संक्रमणाच्या तब्बल 19 महिन्यानंतर साताऱ्यात विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात संवाद साधला.
ते म्हणाले, महाविकास आघाडी राज्यात शरद पवार यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे कार्यरत असून भाजपने या सरकारमध्ये कितीही वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला तरी ते यामध्ये यशस्वी होणार नाही. भाजप साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे. त्यांचे अधिवक्ता सदावर्ते यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन सिल्वर ओक प्रकरण घडवून आणले. आमदार खासदार राणा दांपत्याने हनुमान चालीसा च्या नावाने वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांची त्या प्रकरणात भर पडली आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन दंगली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घरावर चालून जाण्याची ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि त्या घटनेत खरोखर जर शिवसैनिक सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली. नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने झाल्याचाही आरोप त्यांनी केला. या राजकारणाचा सर्वसामान्य नागरिकांना काडीमात्र फायदा नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व धुरा माननीय पवार साहेबांच्या हाती असून तेच पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी या मागणीला अजिबात भीक घालू नये अशी अपेक्षा हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. भाजपचा वरदहस्त लाभलेल्या मनसेने राज्यातील सर्वसामान्यांचा विचार करताना राज्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले.