maharashtra

'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे'

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

'Uddhav Thackeray should take off the mask of motherhood'
'शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावं लागलं?' असा सवाल करतानाच 'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

मुंबई : 'शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावं लागलं?' असा सवाल करतानाच 'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यांवरुन जोरदार टोलाही लगावला होता. मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावं लागलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तुमची महत्त्वकांक्षा ती तुम्ही पूर्ण केली त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार,' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
'शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचं सोनं लुटलं जायचं. पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिलं. जनतेने भाजपला नाकारलं नाही. काँग्रसे राष्ट्रवादीला नाकारलं. शिवसेनेला वरपास केलं याचं त्यांना विस्मरण झालं आहे. आम्ही ७० टक्के जागा जिंकल्या. तुम्ही ४५ टक्के जागा जिंकल्या. तुम्हाला जनतेने नाकारलं. तुम्ही बेईमानी करुन सत्तेवर आलात हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे,' अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला आहे.
'मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगाल करायचाय म्हणजे काय करायचंय? यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहीत आहे का? आणि तुम्हाला बंगाल करायचाय म्हणजे जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवणार आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेल ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही,' असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
'मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही पद्धत बदलली पाहिजे म्हणजे काय?, आंबेडकरांचे संविधान बदलण्याचे मनसुबे त्यांनी बोलून दाखवले. काहीही हे मनसुबे आणि छुपा अंजेडा काही डाव्या विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन रचताय पण काहीही झालं तरी तो कधीच पूर्ण होऊ देणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.