भारत सरकारच्या डाक विभागामार्फत प्रामुख्याने बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यातीलच सुकन्या समृध्दी ही योजना प्रत्येक कन्यारत्न लाभलेल्या पालकांची बचती बरोबरच भविष्यकालिन चिंता मिटवणारी योजना आहे.
सातारा : भारत सरकारच्या डाक विभागामार्फत प्रामुख्याने बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यातीलच सुकन्या समृध्दी ही योजना प्रत्येक कन्यारत्न लाभलेल्या पालकांची बचती बरोबरच भविष्यकालिन चिंता मिटवणारी योजना आहे. आपल्या कुटुंबातील 10 वर्षाच्या आतील प्रत्येक सुकन्येच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृध्दी योजनेचा स्विकार प्रत्येक पालकांनी करावाच, असे आवाहन करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भारतीय टपाल खात्याच्या सातारा विभागाने छोट्या-मोट्या प्रयत्नांमधुन पोस्टाच्या बचत व गुंतवणक योजनांचा शक्य तितका अधिक प्रसार करावा अश्या सूचना ही केल्या.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सातारा पोस्ट खात्याच्या सिनिअर पोस्ट मास्टर स्वाती दळवी यांच्याकडून पोष्टखात्याच्या विविध योजनांचा आढावा घेतल्यावर जलमंदिर पॅलेस येथून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात पूढे म्हटले, भारतीय टपाल खात्याने आपल्या व्यावहारीक आणि मानसिक कार्यपध्दतीने अलिकडच्या काळात फार मोठा बदल केलेला आहे. पहिल्यापासूनच भारतीय डाक खात्यावर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय व्यक्तींचा फार मोठा विश्वास आहे. टपाल खात्यानेही हा विश्वास जपण्याबरोबरच तो उत्तरोत्तर वाढवला आहे. आजही पोष्टमन ही व्यक्ती आमच्यासह जवळजवळ सर्वांनाच आपली घरची व्यक्ती वाटते, यामध्ये पोष्ट खात्याचे यश सामावलेले आहे. भारतातील भाषिक आणि प्रांतिकेच्या विविधतेमध्ये भारतीय टपाल खात्याने आजपर्यंत सातत्याने सर्वोत्तम विश्वासार्ह टपाल सेवा आणि बचत/ अल्प गुंतवणुक सेवा दिलेली आहे.
आता पोष्ट खात्याने बँकींग व्यवसाय देखिल सुरु केला आहे. स्वातंत्रयोत्तरा नंतरच्या अलिकडच्या 10/20 वर्षातील तीव्र स्पर्धात्मक युगात भारतीय टपाल खाते स्पर्धेला पुरुन उरताना अधिक विश्वासार्ह ठरले आहे. याच टपाल खात्याची सुकन्या समृध्दी योजना गेल्या काही वर्षापासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये वार्षिक जास्तीत जास्त दिड लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करता येते. तसेच रुपये 250/- फक्त भरुन, आपल्या कुटुंबातील 10 वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावाने पालकांना जन्मतारखेच्या दाखला आणि केवायसी (know your customer) पुराव्यासह सुकन्या समृध्दी योजनेचे खाते सुरु करता येते. 15 वर्षापर्यंत खात्यात दरवर्षी दिड लाखापर्यंतच्या मर्यादेत कोणत्याही महिन्यात कितीही रक्कम भरता येते.
मुलीच्या 18 व्या वर्षानंतर मुदतपूर्व किंवा खाते सुरु केल्यापासून 21 वर्षानंतर मुदतीअंती खाते बंद करता येते. योजना सुरु केल्यावर 5 वर्षानंतर वैध कारणाकरीता खाते बंद करता येवू शकते. त्यामुळे ही योजना ऐनवेळी पैशाची गरज भागवणारी चांगली गुंतवणुक ठरत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त कन्यारत्न पालकांनी फायदा घेवून, आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता मिटवावी, असे देखील खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.
दरम्यान, पोस्ट खात्याच्या विविध सेवा सुविधांचा प्रत्येक नागरीकांनी लाभ घ्यावा, पोस्ट खाते आपल्याला चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी तत्पर आहे, असे देखिल आवाहन सर्वसामान्य जनतेला खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.


