जिल्ह्यातील साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्वरित दुसरा हप्ता ऊसउत्पादकांना द्यावा, त्यासाठी आपण स्वतः आदेश काढावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली.
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्वरित दुसरा हप्ता ऊसउत्पादकांना द्यावा, त्यासाठी आपण स्वतः आदेश काढावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, उपाध्यक्ष उत्तमराव खबाले, अस्लम तडसरकर आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने बंद झाले आहेत.
या वर्षी कारखान्यांनी तीन हप्त्यांमध्ये उसाचे बिल देण्याचे जाहीर केले आहे, त्याप्रमाणे पहिला हप्ता ऊस गेल्यानंतर मिळाला आहे. दुसरा हप्ता कारखाना बंद झाल्यानंतर देण्याचे ठरले आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दुसरा हप्ता ऊसउत्पादकांना तातडीने देण्यासाठी आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावेत, कारण शेतकऱ्यांना आता शेतीच्या मशागत, खत, बियाण्यांसाठी पेशाची अत्यंत गरज आहे. अशा वेळी हक्काचे पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकाराकडे हात पसरायची वेळ येते. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसउत्पादकांचे दुसरे बिल त्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करावे, यासाठी आपण प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे.


