फडतूस माणसांच्या सवंग राजकारणावर किती बोलायचे?
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा नवनीत राणा यांना टोला
महाराष्ट्राच्या राजकारणात काही फडतूस अपप्रवृत्ती बोकाळल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात नाही, असा दिवस नाही. या प्रवृत्तींनी इतके सवंग राजकारण केले आहे की त्याची पातळी पाहून त्यावर न बोललेलेच बरे, अशी सडकून टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी नवनीत राणा यांच्यावर पत्रकार परिषदेत केली.
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात काही फडतूस अपप्रवृत्ती बोकाळल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात नाही, असा दिवस नाही. या प्रवृत्तींनी इतके सवंग राजकारण केले आहे की त्याची पातळी पाहून त्यावर न बोललेलेच बरे, अशी सडकून टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी नवनीत राणा यांच्यावर पत्रकार परिषदेत केली.
सातारा येथील विश्रामगृहात नीलमताई गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या पुढे म्हणाल्या, आमदार नवनीत राणा यांच्या राजकीय उंची बद्दल मी न बोललेलेच बरे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कर्तुत्ववान मुख्यमंत्री असून महाविकासआघाडी चा कारभार ते उत्तमरीत्या सांभाळत आहेत. मात्र काही प्रवृत्ती सुपारी घेतल्याप्रमाणे बोलत असतात आणि कृती करत असतात. नवनीत राणा यांच्या अनेक आरोपांत बद्दल काय सिद्ध व्हायचे राहिले आहे. त्यांचा राजकीय सवंगपणा उथळ स्वरूपाचा आहे. या फडतूस माणसांविषयी न बोललेलेच बरे, अशी सडकून टीका निलम गोऱ्हे यांनी नवनीत राणा यांच्यावर केली.
नीलम गोऱ्हे जिल्हा दौऱ्यावर असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्या दोन दिवस सातत्याने बैठका सुरू आहेत. याबाबत निलमताई म्हणाल्या, राज्यातील शाश्वत विकासासाठी शासनाने पाचशे कोटी रुपये निधी जाहीर केला असून कोरोना काळात ज्यांचे पालक दगावले आणि रुग्ण दगावले त्यांच्या मदत आणि पुनर्वसनाचा मी आढावा घेतला. या आढाव्या संदर्भात सातारा जिल्ह्यातील 849 एकल महिलांना तीन एकर शेती करता माणदेशी फाउंडेशन च्या माध्यमातून बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील चार धोकादायक पूल आहेत. या पुलांना निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही राज्य शासनाकडे शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासगी हॉस्पिटलमध्ये धर्मादाय हॉस्पिटलचा दर्जा असतानाही बिलामध्ये रुग्णांना सवलत मिळत नाही. त्या सवलतीचाही आढावा यावेळी घेण्यात आला. केंद्र सरकारच्या नोंदणी पोर्टलवर श्रमिक मजुरांची नोंद अण्णासाहेब महामंडळ चर्मकार महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून भरघोस मदत याविषयी शिफारस करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सहा कोटीची तर असंघटित क्षेत्रातील कामगारांना 70 कोटीची मदत झाली आहे. यामध्ये रिक्षाचालकांचाही समावेश आहे.
चर्चेच्या ओघात पुन्हा राजकीय घडामोडींवर भाष्य करताना नीलम गोर्हे म्हणाल्या, राज्यात सारकाही महा विकास आघाडीच्या माध्यमातून आलबेल सुरू असताना काहींच्या माध्यमातून भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत आहे. काही राजकीय नेते सुपारी घेतल्याप्रमाणे बोलत असून बोलण्याचा विषय नाहक राजकीय वळणावर आणून ठेवण्यात आला आहे. बोलणाऱ्यांचे नेते कोण आहेत ते सार्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. ज्यांना महाराष्ट्रात नवीन काही घडवायचे होते त्यांची आजची भूमिका त्यांच्यामुळेच या भूमिकेशी पूर्णपणे विसंगत आहे. भाजपचे दुसरी बोलणारे नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत किती प्रेस घेतल्या? त्यांनी किती आरोप केले? किती घोटाळे उघड झाले? भाजपचे दुसरे नेते रावसाहेब दानवे यांनी सेनेचे 22 आमदार माझ्या खिशात असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. त्यामुळे शिवसेनेला वेगवेगळ्या माध्यमातून सत्तेतून पायउतार करायचे भाजपचे प्रयत्न अपयशी होत असल्याने त्यांचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा टोला नीलम गोर्हे यांनी लगावला. ओबीसी आरक्षणाच्या बाबत महा विकास आघाडी सरकारच या धोरणाला मारक असल्याचा आरोप भाजपने केला. याविषयी बोलताना नीलमताई म्हणाल्या, ओबीसी आरक्षणाचे विधेयक देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तयार करून ते सादर करण्यात आले होते. त्याच्यामध्ये राजकीय मुद्देसूदपणा नसल्यानेच ते कोर्टात टिकले नाही. आपण करायचे आणि नाव दुसऱ्यावर घ्यायचे, हे त्यांना शोभत नाही. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे संविधानिक मुद्दे आहेत. त्यावर विरोधकांनी कोणतेही आरोप केले तरी त्याला अर्थ प्राप्त होत नाही, असाही टोला त्यांनी लगावला.


