सातारा जिल्हा रुग्णालयातील ओपीडीचे डॉक्टरच बेपत्ता
रुग्णांना उपचार सेवा मिळत नसल्याने संताप
सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव हक्काचे ठिकाण असणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर उपचारांच्या ओपीडी वेळेआधीच बंद होत असल्याने रुग्णांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. त्यामुळे रुग्णांनी उपचार नक्की घ्यायचे कोठे, असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. डॉक्टर नक्की जातात कुठे आणि करतात काय, या विषयावर संशोधन होणे गरजेचे झाले आहे.
सातारा : सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव हक्काचे ठिकाण असणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर उपचारांच्या ओपीडी वेळेआधीच बंद होत असल्याने रुग्णांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. त्यामुळे रुग्णांनी उपचार नक्की घ्यायचे कोठे, असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. डॉक्टर नक्की जातात कुठे आणि करतात काय, या विषयावर संशोधन होणे गरजेचे झाले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना चा संसर्गदर अत्यंत नगण्य असून गेल्या आठ दिवसापासून तर हा संसर्गदर शून्यावर येऊन पोहोचला आहे. जिल्हा रुग्णालयाने सुद्धा जवळपास सहा कक्ष बंद करून ते सर्व कक्ष इतर उपचारांसाठी खुले केले आहेत. कान, नाक, घसा याशिवाय इतर गंभीर आजार, प्रसूती तसेच श्वानदंश या विविध उपचारांसाठी तळमजल्यावर चार ओपीडी विभाग उपलब्ध आहेत. हे ओपीडी सकाळी वेळेप्रमाणे नऊ वाजता सुरु होणे अपेक्षित असते. मात्र ओपीडी चे डॉक्टर वेळेत पोहोचतात. मात्र पाहिल्या तासाभरातच ओपीडीमधून ते गायब होतात. त्यामुळे रुग्णांना अर्धा ते पाऊण तास ताटकळत थांबावे लागते. याशिवाय संध्याकाळी चार वाजेपर्यंत ओपीडी करून डॉक्टर गायब होत असल्याने चार नंतर येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांचे उपचार मिळत नाहीत. याशिवाय पेपरच्या रांगांमध्ये रुग्णांच्या चपला शिजत असल्याने केसपेपर मिळून रुग्ण व पुढे जाईपर्यंत ती बंद झालेली असते. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मुळात सातारा जिल्हा रुग्णालयाला एक एमडी डॉक्टर आणि चार वैद्यकीय अधिकारी यापूर्वी सेवेमध्ये उपलब्ध झाले आहेत. असे असताना जर सर्वसामान्य रुग्णांना उपचार मिळत नसतील तर अशा उपचारकेंद्रांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेचा आहे. विभागामध्ये उपचार चांगले मिळतात. मात्र ही सेवा तितक्याच विभाग पुरती मर्यादित आहे. इतर वेळी मात्र ओपीडीतील डॉक्टर कॅन्टीन मध्ये रेंगाळत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर यंत्रणेचा धाक नसल्यामुळे ओपीडी नक्की अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न विचारला जात आहे. रुग्णालय व्यवस्थापनाच्या प्रशासनामध्ये कारणे दाखवा नोटीस देण्याची परंपरा नसल्याने कोणीही यावे आणि कधीही उपचार करावे, असा प्रकार सुरू झालाय की काय, अशी शंका येऊ लागली आहे. या ओपीडी आणि त्यांच्या उपचार पद्धती यामध्ये शिस्त आणावी, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.


