maharashtra

शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला कोण वाली आहे का नाही?

खोडवा आले खरेदीत नवा व जुना मालाचे वर्गीकरण करण्याची व्यापाऱ्यांनी पाडली नवीच प्रथा!!

कोरोना काळात रसातळाला गेलेला शेतकरी कसाबसा सावरतोय , तो पर्यंतच आले पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर  खोडवा आल्याचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी  गडांतर आणले आहे.

पुसेगाव : कोरोना काळात रसातळाला गेलेला शेतकरी कसाबसा सावरतोय , तो पर्यंतच आले पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर  खोडवा आल्याचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी  गडांतर आणले आहे. समाजात सर्व स्तरातील लोकांची एकजूट होईल पण शेतकरी मात्र कधीही संघटीत होणार नाही याची कल्पना सर्वच व्यापाऱ्यांना असल्याने स्वतः च्या फायद्याचे निकष लावत शेतकऱ्यांच्या मालाला अक्षरशः मातीमोल भावाने वर्गीकरण करत खरेदी करतायेत,यावर आमदार खासदार, लोकनियुक्त  प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सदस्य, शेतकरी संघटना तसेच समाजातून कोणीही उठाव करण्याचा साधा प्रयत्न देखील करत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे.
खोडवा आले पिकाचा दर दिवसेंदिवस ढासळत असल्याने शेतकरी वर्गात आधीच चिंतेत आहे.भांडवली पीक असलेल्या या आल्याची जोपासना करताना शेतकरी वर्ग अक्षरशः कर्जबाजारी होत असतोय, त्यातच दिवसेंदिवस रासायनिक बरोबरच सेंद्रिय खतांच्या,औषधांच्या वाढलेल्या किंमती, रोजगार मंडळींनी वाढवलेले दर यामुळे शेतकरी आले लागवडीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करत असतो. सध्या आले व्यापाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी खोडवा आले खरेदी करताना शेतकऱ्यांचे अक्षरशः लचके तोडले असल्याचे जाणवत आहे.
गतवर्षी लागवड केलेल्या आल्याला (म्हणजे दिडीचे आले) व्यापाऱ्यांच्या मनमानी संकटाने ग्रासले आहे. लागवडीपासून दीड वर्षानी जेव्हा हे दिडीचे आले काढले जाते त्यावेळी त्यात जुना माल मोठ्या प्रमाणात, तर नवीन माल तुलनेने कमी निघत असतो. आजपर्यंत नेहमी या आल्याच्या काढणीवेळी जुन्या व नव्या मालाला सद्यस्थितीचा एकच दर मिळत होता. मात्र यावर्षी व्यापाऱ्यांनी अश्या खोडवा आले पिकाच्या जुन्या मालाला सुमारे १३ ते १४ हजार रुपये प्रति गाडी (पाच क्विंटल) तर नव्या मालाला सुमारे ४ हजार रुपये प्रति गाडी प्रमाणे दर काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आले उत्पादक शेतकऱ्यांना छळणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनाने काहीतरी निर्बंध लावावेत, तातडीने कृषिविभागाच्या वतीने बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आले हे वर्षभराचे पीक असते. मात्र दर नसेल तर शेतकरी आल्याचे पीक जमिनीत आणखी सहा महिने ठेऊन दराची वाट पाहत असतो. दरम्यान त्या आल्यात नवीन वाढ होत असते. सुमारे दीड वर्षाचा कालावधी झाल्यानंतर ते पीक काढले जाते. त्यावेळी नवीन मालाची वाढ त्यात झालेली असते. दर एकच असल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक लाभ होऊन अधिक माल निघाल्याचे समाधानही मिळत होते. मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारावर आमदार, खासदार, मार्केट कमिटी, शेतकरी संघटनेचा कुणाचाच धाक नसल्याने अशी अवस्था झाली आहे. अशा व्यापाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचे धंद्याचे लायसन्स जप्त करावे
- बापूराव पांडेकर, आले उत्पादक शेतकरी.