कुशी, लिंब, नागेवाडी ग्रामस्थांचा आत्मदहन आंदोलनाचा इशारा
यशराज इथेनॉलच्या प्रदूषणाच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक
नागेवाडी आणि लिंब या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीवर असणाऱ्या यशराज इथेनॉल या कंपनीमुळे गावातील जलस्त्रोतांचे प्रदूषण झाले आहे. तसेच कंपनीच्या हवेतील प्रदूषणामुळे येथील विषयुक्त अन्न सेवन करावे लागत असून जमीनही नापीक झाली आहे.
सातारा : नागेवाडी आणि लिंब या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीवर असणाऱ्या यशराज इथेनॉल या कंपनीमुळे गावातील जलस्त्रोतांचे प्रदूषण झाले आहे. तसेच कंपनीच्या हवेतील प्रदूषणामुळे येथील विषयुक्त अन्न सेवन करावे लागत असून जमीनही नापीक झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या एक तारखेला कंपनीच्या गेटवर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा कुशी, लिंब, नागेवाडी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहांमध्ये प्रदूषणाच्या त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी धर्मेंद्र सावंत, किशोर गायकवाड, विजय सावंत, विकास सावंत, चंद्रकांत साळुंखे, विनोद शिंदे, अशोक सावंत, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने गावाची बाजू मांडताना धर्मेंद्र सावंत म्हणाले, "औरंगाबाद येथील एस. एस. होळकर यांच्या मालकीची यशराज इथेनॉल ही कंपनी गेल्या दहा वर्षापासून कुशी आणि नागेवाडी च्या हद्दीमध्ये सुरू आहे. कंपनीला एसटीपी आणि चिमणीला फिल्टर बसवणे बंधनकारक असतानाही अद्याप कंपनीने वारंवार भूलथापा देऊन या यंत्रणा उभारलेल्या नाहीत. त्यामुळे गावातील जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. येथील विहिरींचे पाणी दूषित झाले असून नापीक जमीनही वाढली आहे. कंपनीच्या चिमणी मधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे या तिन्ही गावांच्या वातावरणामध्ये विशिष्ट प्रकारची काजळी निर्माण झाली असून या काजळीचा थर येथील पिकांवर आणि अन्नावर बसत आहे. त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना विषयुक्त अन्नाचे सेवन करावे लागत आहे. तसेच केमिकल युक्त पाण्यामुळे आतड्याचे गंभीर आजार निर्माण होण्याचा धोका आहे.
या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे गेल्या दोन वर्षापासून वारंवार पाठपुरावा सुरू असून कंपनीने सर्व परिस्थितीचा अहवाल तयार करून केवळ नोटीस बजावण्याचा फार्स केला आहे. आणि प्रत्यक्षात पुणे विभागाला कारवाईचा अधिकार आहे, असे थातूरमातूर कारण देऊन आपली जबाबदारी झटकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यशराज इथेनॉल या कंपनीमध्ये ज्वलनशील पदार्थ तयार होतो मात्र येथे फायर ऑडिट करणारी कोणतीही यंत्रणा नसून आगीसारख्या दुर्घटना घडल्यास खबरदारीच्या उपाययोजनांचे कोणतेही साधने नाहीत. यासंदर्भात 19 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र येत्या एक तारखेपर्यंत या संदर्भात कोणतीच कारवाई झाली नाही, जर ही कारवाई होणार नसेल तर येत्या एक तारखेला सकाळी अकरा वाजता यशराज इथेनॉल कंपनीच्या प्रवेशद्वारावर आम्ही सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.


