maharashtra

विकास सेवा संस्थांनी ग्राहकांना गुणात्मक व तत्पर सेवा देणे काळाजी गरज : बाळासाहेब पाटील


आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात देशामध्ये नावलौकिक मिळविलेला असून प्रगत बँक म्हणून सहकारीतील इतर बँका व विविध संस्था पाहत आहेत. बँकेच्या विकासात या तालुक्याचे योगदान मोठे आहे.

सातारा : भारताचे माजी पंतप्रधान व सहकारी चळवळीचे प्रणेते कै.पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त दि.14 नोव्हेंबर रोजी सहकार सप्ताहाचे औचित्य साधून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा सहकारी बोर्ड मर्या यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व विकास संस्थांचे संचालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण सौ.वेणुताई सांस्कृतिक भवन, कराड येथे आयोजित केले होती. कार्यशाळेचे उद्घाटन आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व बँकेचे अध्यक्ष, नितीन जाधव अध्यक्षतेखाली तसेच उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालिका सौ. ऋतुजा पाटील, संचालक लहुराज जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड, धनंजय शेडगे, संजय साळुंखे अध्यक्ष सातारा जिल्हा सहकारी बोर्ड यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यशाळेला मार्गदर्शन करताना आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात देशामध्ये नावलौकिक मिळविलेला असून प्रगत बँक म्हणून सहकारीतील इतर बँका व विविध संस्था पाहत आहेत. बँकेच्या विकासात या तालुक्याचे योगदान मोठे आहे. विकास सेवा संस्थांचे संचालक सदस्य यांनी संचालक म्हणून कामकाज करीत असताना संस्थेची कार्यपध्दती व आपले कर्तव्य, जबाबदारी समजावून घेवून दैनंदीन कामकाजाकडे लक्ष दिले पाहिजे. संस्थेच्या सचिवाचे कामकाजावर नियंत्रण ठेवले पाहिजे. विकास सेवा संस्था सक्षम व सदृढ झाल्या पाहिजेत व सर्वसामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या सहकार विभागाने विकास संस्थांना संगणकीकरणासाठी कॉमन सॉफ्टवेअर/हार्डवेअर उपलब्ध करुन देणेचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु होईल, त्यामुळे विकास संस्थांनी पारदर्शक कामकाज केले पाहिजे. विकास संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याबरोबर रोजगार निर्मितीचे केंद्र बनणेसाठी विकास संस्थांनी बहुउद्देशिय सेवा संस्था म्हणून कामकाज करणेचे आवाहन त्यांनी केले.
नितिन पाटील म्हणाले, बँकेची स्थापना यशवतंराव चव्हाण, किसन वीर, आर. डी. पाटील या नेत्यांनी सर्वसामान्य व गोरगरीब शेतकरी सभासदांचे जीवनमान उंचावणेसाठी केलेली असून बँकेच्या योजनांचे माध्यमातून गोरगरीब जनतेची उन्नती झाली पाहिजे. विकास सेवा संस्थांच्या संचालक सदस्यांना त्यांचे कामकाज अनुषंगाने प्रशिक्षण देणारी राज्यातील पहिली बँक आहे. बँक शेतकरी सभासद व विकास सेवा संस्थांसाठी फार मोठया प्रमाणावर कामकाज करीत असून सामाजिक बांधिलकी जपत आहे. विकास संस्थांनी कर्जपुरवठा करुन व्यवसायात वाढ केली पाहिजे. विकास सेवा संस्थांच्या संचालक मंडळाने संस्थेच्या महिन्यातून सभा घेवून व्यवसाय वाढ व दैनंदिन कामकाजाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सचिवांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विकास संस्थांचे संचालकांनी तत्पर असणे आवश्यक आहे. संस्थांनी पारंपारिक पध्दतीने कामकाज न करता ऑनलाईन पध्दतीने कामकाज सुरु करणे काळाजी गरज आहे. बँकेने सध्याचे कोअर बँकिंग पध्दतीत सुधारणा करुन नवीन कोअर बँकिंग पध्दतीचा अवलंब करणार असून याबाबतची कार्यवाही सुरु आहे. नाबार्ड/शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य ग्राहकांना लाभ होणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बँकेने सर्व कर्ज योजनांचे व्याजदर कमी केले असून ठेवीवरील व्याजदरात वाढ केलेली असलेने बँकेच्या विविध कर्ज व ठेव योजनांचा प्रचार व प्रसार करुन शेतकरी सभासदांना लाभ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत.
अनिल देसाई म्हणाले, सहकारी बँकिंग क्षेत्रात आपल्या बँकेचा फार मोठा नावलौकिक झालेला आहे,. या बँकेचे अनेक थोर नेत्यांनी नेतृत्व केले व त्यांनी बँकेचा विकास होणेसाठी प्रयत्न केले. अलिकडे सर्व क्षेत्रात बदल होत असून सहकारी बँकिंग क्षेत्रातील कार्यपध्दतीत सुध्दा सतत बदल होत असून त्या पध्दतीने कार्यपध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. विकास सेवा संस्थांनी सुध्दा आपल्या कार्यपध्दतीत बदल करणे गरजेचे असून त्यांचे संचालक सदस्य यांना आपले अधिकार, कर्तव्ये व जबाबदारी याची माहिती असली पाहिजे. बँकेने विकास संस्थांचे संचालक सदस्यांसाठी आयोजित केले प्रशिक्षणाचा त्यांना निश्चित लाभ होईल.
डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, समाजाच्या विकासात सहकाराला अनन्यसाधारण महत्व असलेमुळेच आंतरराष्ट्रीय सहकार दिन सुध्दा साजरा केला जातो. सहकारामुळेच सर्वसामान्य व कष्टकरी जनतेचा विकास झाला. यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील व किसन वीर या दिग्गज नेत्यांनी सहकाराचे महत्व जानले व आपल्या बँकेची स्थापना केली व सर्वसामान्यांची उन्नती होईल याचा विचार केला. बँकेला स्थापनेपासूनच चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँक सतत नफ्यात व ऑडीट अ’ वर्ग प्राप्त करत आलेली आहे. बँकेचे एकूण कामकाज चांगले असलेमुळे बँकेला नाबार्ड व त्याच बरोबर इतर विविध संस्थांचे 100 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झालेले असून बँक देशात अग्रगण्य आहे. जिल्ह्यातील 954 पैकी 913 विकास संस्था नफ्यात आहेत. विकास संस्थंनी चांगले काम करुन सभासदांना लाभांश वाटप केले पाहिजे. संचालकांची कर्तव्ये, जबाबदार्‍या, नियंत्रण या बाबी समजावून घेवून संस्थेच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करावी.
याप्रसंगी कार्यशाळेस खरात, प्रशिक्षक म्हणून विकास सेवा संस्थांचे संचालक यांचे अधिकार, कर्तव्ये, जबाबदा-या, सचिवांचे कामकाजावर नियंत्रण तसेच व्यवसाय वाढ इत्यादि अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करताना त्यांनी विकास सेवा संस्थेच्या संचालक सदस्यांनी आपल्या सभासदांना विविध कर्ज योजनांचे माध्यमातून कर्ज वाटप केले पाहिजे व संस्थेचा व्यवसाय वाढविणेसाठी प्रयत्न केले पाहिजे. संगणकीकृत कामकाज करुन सोसायटीच्या कार्य पध्दतीत सुधारणा केली पाहिजे. सोसायटीची सभासद संख्या वाढविणेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. बँकेच्या नवनवीन योजना सभासदांपर्यत पोहोचविल्या पाहिजेत. कर्ज वाटप झालेनंतर त्याची वसुली नियमित होईल यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.
याप्रसंगी विकास संस्थांनी उपस्थित केलेल्या अडीअडचणीचे व शंकांचे निरसन बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांनी केले.