राजकारणाच्या मैदानात अल्पावधीतच चुणूक दाखवून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी अशक्यप्राय विजय मिळवून इतिहास घडवला होता. क्रिकेटच्या मैदानातही केवळ २ चेंडूत एका षटकारासह ६ धावा काढून आपल्या आंबेघर संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
केळघर : राजकारणाच्या मैदानात अल्पावधीतच चुणूक दाखवून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी अशक्यप्राय विजय मिळवून इतिहास घडवला होता. क्रिकेटच्या मैदानातही केवळ २ चेंडूत एका षटकारासह ६ धावा काढून आपल्या आंबेघर संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
आंबेघर येथील १९९८च्या सातवी बॅचमधील माजी विद्यार्थी संघटनेने नवी मुंबईतील नेरुळ येथे नुकतेच विद्यार्थी चषकाचे आयोजन केले होते. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम आंबेघर प्राथमिक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत बी.सी. सी. करंजे संघाने प्रथम क्रमांक मिळवला तर निझरे संघाने द्वितीय व ओखवडी संघाने तृतीय क्रमांक मिळवला. आलेवाडी संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. यावेळी ४०वर्षावरील वयोगटातील आंबेघर संघ विरुद्ध जावळी या संघातील प्रदर्शनीय सामन्यात श्री. रांजणे यांच्या नेतृत्वाखाली आंबेघर संघाने विजय मिळवला.
या वेळी बोलताना रांजणे म्हणाले, क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून युवकांच्या प्रतिभेला एक व्यासपीठ मिळत असून या स्पर्धेतून मिळणाऱ्या निधीतून आंबेघर शाळेला मदत केली जाणार आहे.१९९८ च्या सातवी बॅचचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या वेळी नवी मुंबईचे नगरसेवक सुरेश पाटील, संदीप म्हात्रे, गिरीश म्हात्रे, उद्योजक राजेंद्र धनावडे, सुरेश वाडकर, हरिभाऊ शेलार,मुख्याध्यापक सुनील धनावडे, विलास कारंडे, विठ्ठल शेलार , प्रशांत शेलार, सचिन शेलार, सुधीर शेलार, वैभव शेलार, सुनील शेलार, रवी शेलार, प्रशांत पार्टे, अनिल कदम, सुनील धनावडे, निलेश शेलार, यांच्यासह आंबेघर प्राथमिक शाळेच्या १९९८ च्या बॅचचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी या स्पर्धेतून मिळालेल्या फायद्यातून सातवी बॅच च्या वतीने प्राथमिक शाळेला एक लाख रुपयांची मदत शाळेचे मुख्याध्यापक सुनील धनावडे यांच्याकडे दिली.


