राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी
सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव, कराड या पाच तालुक्यांच्या 77 गावांमध्ये 600 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान जाहीर करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव, कराड या पाच तालुक्यांच्या 77 गावांमध्ये 600 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान जाहीर करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सादर केले. काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये यावेळी महिला आघाडीचे अध्यक्ष अल्पनाताई यादव, सरचिटणीस धनश्री महाडिक, समन्वयक मनीषा पाटील, नरेश देसाई इत्यादी यावेळी उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने दीडशे हेक्टर होऊन अधिक पिकांचे नुकसान केले आहे. यामुळे काढणीला आलेली पिके कुजून गेली आहेत. कोरेगाव तालुक्यातील 18 गावांमध्ये 121 हेक्टर वरील ऊस, घेवडा, सोयाबीन, स्ट्रॉबेरी, भाजीपाला इत्यादी पिकांची हानी झाली. खंडाळा. महाबळेश्वर, खटाव तालुक्यातील एकूण 42 गावांमध्ये 326 हेक्टरचे बटाटा, कांदा, मका, सोयाबीन, उडीद, इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नुकसानग्रस्त भागातील शेतींचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्य शासनाने या अतिवृष्टीची दखल घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाली असून जगात 121 देशांपैकी भारत 107 व्या क्रमांकावर आला आहे. भारताची ही प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र सरकारकडून राबविले जावे, अशी अपेक्षा सुरेश जाधव यांनी व्यक्त केली. तसेच वाठार येथील कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर या संदर्भात तातडीने कारवाई व्हावी, अशीही मागणी सुरेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केली.


