maharashtra

उंडाळेच्या व्यासपीठावरून समाजबांधणीचे मोठे काम

आ. पृथ्वीराज चव्हाण : उंडाळेत स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन संपन्न

Great social work from the platform of Undale
थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या नावाने स्वर्गीय विलासकाकांनी सुरू केलेले उंडाळेचे व्यासपीठ राष्ट्रीय विचाराचे व्यासपीठ असून या व्यासपीठावरून समाज बांधणीचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराड : थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या नावाने स्वर्गीय विलासकाकांनी सुरू केलेले उंडाळेचे व्यासपीठ राष्ट्रीय विचाराचे व्यासपीठ असून या व्यासपीठावरून समाज बांधणीचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 48 व्या स्मृतिदिनानिमित्त उंडाळे ता. कराड येथे आयोजित 39 व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी यावर्षीचा प्रतिष्ठेचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांना आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते प्रदान करणेत आला.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील, कार्यक्रमाचे संयोजक रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश जाधव, हरणाई सुत गिरणीचे चेअरमन रणजित देशमुख, ज्येष्ठ नेते साहेबराव पवार, दादा उंडाळकर स्मारक समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त गणपतराव कणसे, सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक दादासाहेब गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विलासकाकांनी कायमच राष्ट्रीय विचारधारेची कास धरली होती. उंडाळे येथे त्यांनी देशातील विविध क्षेत्रातील नामवंत विचारवंतांना आणून उंडाळेला राष्ट्रीय विचाराचं व्यासपीठ बनवले आहे. आज या कार्यक्रमात विलासकाकांची आठवण येते. काकांची आठवण लोकांच्या हृदयात असल्याने ती कोणीही यापुढील काळात पुसू शकत नाही. काकांचा विचार घेऊन उदयसिंह यांचे कामकाज सुरू आहे. 1942 साली दादा उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सरकारच्या विरोधात कराड तहसील काचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. त्या दादांच्या नावाने दिला जाणारा अंत्यत प्रतिष्ठेचा पुरस्कार माझे हस्ते दिला जात आहे, याचे मला समाधान आहे. गेल्या चाळीस वर्षात विलासकाकांनी या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम केले गेलेल्या पिढीचे व नव्या पिढीचे काका दुवा होते, ते काम उदयसिंह मोठ्या जोमाने चालवत आहेत.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, महात्मा गांधीजी, यशवंतराव चव्हाण, दादा उंडाळकर यांचे विचार विलासकाकांनी पुढे चालवले. काकांची पक्ष विचाराची एक निष्ठा वाखाणण्याजोगी होती. काकांनी जे-जे निर्माण केले; त्याचा लोकांच्यासाठी सदुपयोग केला. ते काम उदयसिंह  त्याच जोमाने पुढे चालवत आहेत. स्वातंत्र्य संग्राम अधिवेशनाच्या माध्यमातून विलास काकानी राष्ट्रीय विचाराचं उंडाळेला व्यासपीठ निर्माण केले.
प्रास्ताविकात उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, काकांनी उंडाळे येथे समाज प्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात केली. यातून काकांनी माणूस वैचारिक सक्षम बनवला. काका आज आपल्यात नाहीत. मात्र, त्याचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. काकांनी सुरु केलेले काम अखंडपणे सुरू ठेवण्याची भूमिका स्मारक समितीने घेतली. यापुढील काळातही काकांचे काम आम्ही तितक्याच ताकदीने पुढे चालू ठेवणार आहोत. स्वातंत्र्य लढ्यात आपल्या पूर्वजांनी जो लढा दिला व आपणाला स्वातंत्र्य व लोकशाही मिळवून दिली, ती टिकवण्याचं काम युवकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थित स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने झाली सर्वांचे स्वागत विश्वस्त गणपतराव कणसे यांनी केले. तर आभार प्रा. धनाजी काटकर यांनी मानले. या कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक त्यांचे वारसदार, माजी सैनिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.