maharashtra

रामदास आठवले यांच्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास

अशोक गायकवाड यांनी बदनामी केल्यास दिला आंदोलनाचा इशारा

राज्यघटनेचे शिल्पकार तथा थोर अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्म प्रिय होता. अपरिहार्यतेतून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी वक्तव्य केले होते. मात्र या वक्तव्याचा संदर्भ वेगळा होता आणि प्रसार माध्यमांनी काही वाक्यांचे संदर्भ तोडून त्याचा विपर्यास केला,

सातारा : राज्यघटनेचे शिल्पकार तथा थोर अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्म प्रिय होता. अपरिहार्यतेतून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी वक्तव्य केले होते. मात्र या वक्तव्याचा संदर्भ वेगळा होता आणि प्रसार माध्यमांनी काही वाक्यांचे संदर्भ तोडून त्याचा विपर्यास केला, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
यासंदर्भात जर आठवले यांची कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर रिपाई कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्म जरी प्रिय असला तरी माणसाला माणूसपण म्हणून नाकारणारी व्यवस्था त्यांना नको होती. म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, अशा आशयाचे अभिप्रीत वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्याच्या प्रसिद्धीनंतर प्रसार माध्यमातून त्यांच्यावर टीका सुरू झाली. या टीकेचा खरपूस समाचार रिपाईचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत घेतला.
अशोक गायकवाड पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्म प्रिय होता. त्यांची नाळ या धर्माशी जोडलेली होती. मात्र 1935 मध्ये त्यांनी मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी निर्वाण प्रसंगी मी हिंदू असणार नाही, असे त्यांनी वक्तव्य केले होते. यामागे हिंदू धर्म त्यांना अप्रिय होता असे नाही. त्यांना या धर्माविषयी प्रचंड आस्था होती. तो एक धर्म नसून विचार आहे. पण धर्मातल्या रूढी परंपरांविषयी त्यांना प्रचंड चीड होती. माणसाला माणूसपणा नाकारणारी व्यवस्था त्यांना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी समतेला महत्व देत बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म सुद्धा हिंदू धर्माचाच एक समन्यायविष्कार आहे. बाबासाहेबांनी कधीही हिंदू धर्म सोडून वेगळ्या धर्मामध्ये प्रवेश केला नाही. कारण त्यांना देशाचे अखंडत्व आणि ऐक्य महत्त्वाचे होते.
या वक्तव्याचा काही प्रसार माध्यमांनी विपर्यास केला. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही या वक्तव्याचा विपर्यास करून रामदास आठवले यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आठवले हे नेतृत्व संघर्षातून तयार झालेले आहे. सर्व दलित बांधवांना पुढे घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्यामुळे आमच्या नेत्याची बदनामी कधीही खपवून घेतली जाणार नाही. त्याविषयी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अशोक गायकवाड यांनी दिला.