maharashtra

ओबीसी समाजाचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करण्याचे षडयंत्र?

प्रकाश आंबेडकर : साताऱ्यातील पत्रकार परिषदेत प्रतिपादन

ओबीसी समाजाचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करण्याचे षडयंत्र आहे. मी ओबीसी समाजात वावरतो. मी त्यांना विचारतो तुम्हाला अन्य धर्मात परिवर्तन करायचे आहे का? तर 80 टक्के त्यास नकार देतात. त्यावरुन एनआयएने नेमका कोठून शोध लावला, अशी जोरदार टीप्पणी सध्याच्या पीएफआयच्या छापेमारीवरुन एनआयएवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

सातारा : एनआयएसह एजन्सींना छापे मारण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनी मारलेल्या छाप्यामध्ये काय काय आढळून आले. त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. ओबीसी समाजाचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करण्याचे षडयंत्र आहे. मी ओबीसी समाजात वावरतो. मी त्यांना विचारतो तुम्हाला अन्य धर्मात परिवर्तन करायचे आहे का? तर 80 टक्के त्यास नकार देतात. त्यावरुन एनआयएने नेमका कोठून शोध लावला, अशी जोरदार टीप्पणी सध्याच्या पीएफआयच्या छापेमारीवरुन एनआयएवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशा सर्वच पक्षासह निवडणूक आयोगावर जोरदार टीप्पणी केली.  
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने ते आले होते. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सुप्रिम कोर्टाचा निर्णय आला आणि अनेक मुद्दे अनुत्तरीत आहेत. हाच निर्णय द्यायचा होता तर एवढे दिवस का लावले. दुसरा भाग हा आहे, हे शासन स्टे ऑडर्रवर चालले आहे. जी स्थगिती दिली आहे त्याच्या संदर्भात जजमेंट आलेले नाही. कळीचा मुद्दा हा आहे, राज्यपाल निर्णय घेवू शकतात का?, हा घटनात्मक प्रश्न आहे. आज इलेक्शन कमिशन एक प्रकारची बजबजुरी झाली आहे. कणा नसलेल्या माणसाला संविधानीक पदावर बसवले आहे. त्यांना कोणताही धाक नाही. त्यामुळे मनमानी कारभार सुरु आहे. जी काही घटना करण्यात आली आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, नवीन सभागृह हे जूनं सभागृह संपण्याच्या अगोदर गठीत झाले पाहिजे. म्हणून नवीन प्रश्न निर्माण होवू लागले आहे. मोदींचे सरकार कोणताही निर्णय घेत नाही. अचानकपणे प्रचंड मोठा निधी आल्यासारखे महाराष्ट्र सरकार घोषणा करते. मुख्यमंत्री याना विनंती आहे नेमका किती निधी येतो, किती खर्च होतो, याचा खुलासा केला तर घोषित झालेले प्रकल्प पूर्ण होतील का नाही हे जनतेला समजेल, असे त्यांनी सांगितले. दोन्ही सरकार एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यातूनच खोक्याचे राजकारण बाहेर पडले. वेदांता प्रकल्पाची नेमकी काय आणि कधी बोलणी झाले हे स्पष्ट करावे, म्हणजे खरा प्रकार समजेल. परंतु ह्यांचे तू माझी पाठ खाजवायची नाही, मी तुझी खाजवणार नाही, असे सुरु आहे.  
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत छेडले असता ते म्हणाले, भारत तुटला कुठे आहे?, ते सांगावं. तुटला नाही तर जोडण्याचा प्रयत्न येतोच कुठे? काँग्रेससोबत समझोता करायला तयार आहोत. परंतु ते आमची अट मान्य करत नाहीत. त्यांच्याकडून ज्या चार-चार वेळा हरलेल्या जागा मागितल्या होत्या त्या दिल्या नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीला भिती वाटते, वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केले तर हे मोठे होतील. त्यांना आम्हालाच आयसोलेशनमध्ये ठेवायचे आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला ऑफर दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही संपली आहे. मीच स्वतः घराणेशाही चालवतो, असे सांगत आंबेडकर म्हणाले, आज अनेक मंत्री असे सांगतात की नुसते काय फिरायचे ते फिरा. परंतु निर्णय घ्यायचा नाही. टेबलवर फायली असतात. त्यावर सही करायची. ही लोकशाही नाही तर हुकूमशाही आहे, असे सांगत गडकरी यांनाही टार्गेट करायचे सुरु होते. त्यांचे मंत्रीपद मी जर वक्तव्य केले नसते तर गडकरी गेले असते, असाही गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.