डॉल्बी लावावी असा एक गट मागणी करत असताना डॉल्बी लावू नये असे सूचवताच बैठकीतच तणातणी होवून गोंधळ उडाला. दरम्यान, सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा असून ती जोपासली जावी, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
सातारा : जिल्हा शांतता कमिटीच्या झालेल्या बैठकीत डॉल्बीच्या आवाजाच्या डेसिबलचा डेमो देत गणपती उत्सव काळात त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराच जिल्हा प्रशासनाने दिला. डॉल्बी लावावी असा एक गट मागणी करत असताना डॉल्बी लावू नये असे सूचवताच बैठकीतच तणातणी होवून गोंधळ उडाला. दरम्यान, सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा असून ती जोपासली जावी, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
येथील पोलिस करमणूक केंद्रामध्ये शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी खा.श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे, तहसीलदार राजेश जाधव, मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते.
शांतता कमिटीच्या बैककीच्या सुरुवातीला उपस्थितांना सूचना करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने सर्वांनीच 2 बेस व 2 टॉपला परवानगी मिळावी. तसेच डेसिबील म्हणजे काय? डेसिबल मोजण्याची प्रक्रिया कशी आहे? एमएसईबीने जुने डिपॉझिट परत करावीत. जिल्हा शांत आहे म्हणून दाबू नका. गौण खनिज वाहतुक सुरु असलेल्यांवर कारवाई करावी. अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाने विषय सूचवून त्यांना प्रशासनाने चांगली रक्कम देवून गणराया अॅवॉर्ड द्यावा. कुत्र्यांचा सातार्यात सुळसुळाट असून त्यावर पालिकेने प्रभावी कारवाई करावी. करंजे मधील अतिक्रमण काढावीत. अफलज खान वध देखाव्याला मान्यता मिळावी, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, श्रीकांत शेटे, अरबाज शेख, अॅड. विनीत पाटील, पूजा बनसोडे, हेमंत सोनावणे, संतोष प्रभुणे, चिन्मय कुलकर्णी, मधुकर शेंबडे, गणेश दुबळे यांनी सूचना केल्या.
खा. श्रीनिवास पाटील बोलताना म्हणाले, दोन वर्षे कोरोना असल्याने उत्सव साजरे झाले नाहीत. यामुळे यंदा आम्हाला नाचायचे आहे, असे म्हणताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. उत्सव साजरा होताना सातारा जिल्ह्याच्या परंपरेचा इतिहास असून तो सर्वांनी अबाधित ठेवण्याची गरज आहे. नाव लौकीकाला बाधा येणार नाही, असे कोणतेही कृत्य कोणीही करु नये, असे खा. पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, राज्यात गेली 10 वर्षे काम केले आहे. सातारा बद्दल खूप ऐकून आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नियम व अटींचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एसपी अजयकुमार बन्सल म्हणाले, डॉल्बी हा गौण विषय असून त्यापेक्षा अधिक इतर महत्वाचे विषय आहेत. कोणताही सार्वजनिक उत्सव साजरा होत असताना महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. स्वागत कमानला परवानगी नियम व अटींवर दिली जाईल. देखावे करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही, हे तपासले जाईल. यासाठी शिस्त पाळली जावी. कोणतीही धडधड झाल्यास नियमांप्रमाणे कारवाई करणार असल्याचा इशारा एसपी बन्सल यांनी दिला. दरम्यान, बैठक सुरु असताना पोलिस दलाच्या वतीने 1 बेस व 1 टॉप लावून डेसिबील मोजण्याचा डेमो दिला. त्यावर अधिक डेसिबल झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कोणीही आवाजाचे उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई करणार असल्याचे प्रात्यक्षिक प्रशासनाने दिला.
यावेळी प्रशासनाच्या वतीने बोलताना पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट म्हणाले, खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे अडथळा येत असून राहिलेली कामे लवकर पूर्ण करणार. कृत्रिम तळी उभारली जाणार आहेत. सातार्यातील काही तळी खासगी असल्याने व न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मर्यादा आहेत. तळी काढताना कमीतकमी खर्च केला जाईल. सातार्यातील उत्खनन सुरु असल्याने त्याबाबत काम थांबवून वाहतुक सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी ध्वनी प्रदुषण म्हणजे काय? त्याबाबतचा कायदा, आवाजाची मर्यादा कुठे, किती असावी? याची माहिती दिली.


