maharashtra

कण्हेर धरणातील सहा टक्के पाणी अडवून परिसरातील नागरिकांना बंद पाईपलाईनने पाणी द्यावे : डॉ. भारत पाटणकर यांची मागणी


6% water from Kanher dam should be blocked and water should be given to the citizens of the area through closed pipeline: Dr. Demand of Bharat Patankar
कण्हेर, ता. सातारा येथील धरणातून वर उचलावयाचे सहा टक्के पाणी अडवून उताराच्या बंद पाईपलाईनने संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा : सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर आणि अति पावसाच्या प्रदेशात डोंगर उतारावर शेती करणार्‍या आणि एकच पीक घेऊ शकणार्‍या जनतेची विदारक स्थिती दिसून येत आहे. अशा भागातील जनतेला वेण्णा नदीवर झालेल्या कण्हेर, ता. सातारा येथील धरणातून वर उचलावयाचे सहा टक्के पाणी अडवून उताराच्या बंद पाईपलाईनने संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, शक्य असूनही कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना धरणाच्या बरसा बाजूला देण्यासाठी उपलब्ध असलेल्या सहा टक्के राखीव कोट्यातून शेतीसाठी पाणी देण्यात आले नाही. पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई तयार होते. कण्हेर धरणाच्या परिसरातील 54 गावांमधील लोकसंख्या 50 हजारा दरम्यान असून सुमारे दहा हजार कुटुंबे या गावांमध्ये राहतात. कण्हेर धरणातून 1500 घनमीटर पाणी प्रत्येक कुटुंबाला दिली तर ही कुटुंबे मुंबईच्या स्थलांतरामुळे विदारक परिस्थितीतून बाहेर पडतील.
हे पाणी गावापर्यंत पोहोचवायचे झाले तर तेथील गावे आणि शेती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या उंचीचा प्रश्न तयार होतो. त्यामुळे राखीव असलेले 6 टक्के पाणी धरणाच्या वरच्या बाजूला एक छोटे धरून बांधून साठवले तर ते या सर्व गावातील नागरिकांना बंद पाईपलाईनने देता येणे सहज शक्य आहे.
कण्हेर धरण परिसरात वास्तव्य करणार्‍या जनतेला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान करण्याची त्यांची क्षमता वाढविण्यासाठी ही योजना मंजूर करावी तसेच निधीची तरतूद करून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा असा या भागातील जनतेचा आग्रह आहे. या योजनेच्या मंजुरीची एक पॅटर्न तयार होऊ शकतो. यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली असल्याची माहिती पाटणकर यांनी यावेळी दिली.