सातारा बसस्थानक आगारातून ९० टक्के बसेस रस्त्यावर
६५८ कर्मचारी कामावर रुजू ; लांब पल्ल्याच्या बसेसना अधिक प्राधान्य
सर्वोच्च न्यायालयाने एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा आदेश दिल्यानंतर सातारा बसस्थानक आगारातून ९० टक्के बसेस रस्त्यावर धावू लागल्या असून ६५८ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. लांब पल्ल्याच्या बसेसना अधिक प्राधान्य देण्यात आले असून लवकरच ग्रामीण भागातील एस.टी. सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती सातारा बसस्थानक आगाराच्या प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली.
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा आदेश दिल्यानंतर सातारा बसस्थानक आगारातून ९० टक्के बसेस रस्त्यावर धावू लागल्या असून ६५८ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. लांब पल्ल्याच्या बसेसना अधिक प्राधान्य देण्यात आले असून लवकरच ग्रामीण भागातील एस.टी. सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती सातारा बसस्थानक आगाराच्या प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दि. २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी राज्यभरात संप पुकारला होता. या संपाचा मोठा फटका सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागाला बसला होता. विशेषता शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सातारा तालुक्यातील परळी भाग, जावली, महाबळेश्वर आणि पाटण या डोंगरी भागातील नागरिकांची फार मोठी कुचंबणा झाली होती. दुष्काळी माण - खटाव तालुक्यातही याचा मोठा परिणाम झाला होता. संपाच्या काळात प्रवाशांनी वडाप, खासगी बसेस यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. सर्वोच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचा आदेश दिल्यानंतर तब्बल सात महिन्यानंतर सातारा बसस्थानक प्रवाशांनी गजबजून गेले असून ९० टक्के एस.टी. बसेस रस्त्यावर धावत आहेत. सातारा बसस्थानकात एकूण ६५८ चालक-वाहक कार्यरत असून त्यापैकी संपकाळात १४७ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सध्या ४८० कर्मचारी प्रत्यक्ष कामकाज करत असून निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच कामावर घेण्यात येणार आहे. सध्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सेवेला प्राधान्य दिले असून निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेतल्यानंतर उर्वरित दहा टक्के एसटी सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती रेश्मा गाडेकर यांनी दिली.


